जुलै 2021 मध्ये Jio-Airtel चे ग्राहक वाढले तर व्होडाफोन आयडियाने 14 लाख ग्राहक गमावले: TRAI

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या वोडाफोन आयडिया लिमिटेड (VIL) ने जुलै 2021 मध्ये 14.3 लाख मोबाईल ग्राहक गमावले आहेत. त्याचबरोबर देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओने जुलैमध्ये 65.1 लाख नवीन मोबाईल ग्राहक जोडले, ज्यामुळे बाजारात त्याची पकड मजबूत झाली. त्याचबरोबर भारती एअरटेलच्या ग्राहक संख्येत 19.42 लाखांची वाढ झाली.

कोणत्या टेलिकॉम कंपनीकडे ग्राहकांची संख्या किती आहे?
TRAI ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै 2021 मध्ये जिओची एकूण मोबाईल ग्राहक संख्या झपाट्याने वाढून 44.32 कोटी झाली आहे. त्याचबरोबर एअरटेलचा ग्राहक वर्गही वाढून 35.40 कोटी झाला. दुसरीकडे, जुलै 2021 मध्ये व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या 14.3 लाखांनी घटून 27.19 कोटी झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच तणावग्रस्त टेलिकॉम क्षेत्रासाठी एक मोठे सुधारणा पॅकेज मंजूर केले आहे. पॅकेजमध्ये AGR थकबाकी भरण्यापासून चार वर्षांची स्थगिती देण्यात आली आहे.

टेलिकॉम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी केंद्राने पावले उचलली
केंद्र सरकारने टेलिकॉम क्षेत्रासाठी घेतलेल्या मदत पावलांमध्ये स्पेक्ट्रम शेअर करण्याची परवानगीही दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या बैठकीत टेलिकॉम कंपन्यांसाठी सकल समायोजित महसूल (AGR) च्या व्याख्येत आणि ऑटोमॅटिक रूटद्वारे 100 टक्के थेट विदेशी गुंतवणूकीत बदल करण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे व्होडाफोन-आयडिया सारख्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, ज्यांना मागील वैधानिक थकबाकी म्हणून हजारो कोटी भरावे लागतील.

Leave a Comment