हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे प्रकरण चर्चेत आहे. मात्र आता या हत्येसंबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिणामी या प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी तीव्र मागणी केली जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.
किरण माने यांची पोस्ट
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बहुजनांनो, संतोष देशमुखला न्याय मिळवूनच द्यायचा असेल तर पहिल्यांदा ‘जात’ दूर ठेवा. मिडीयामधून अचानक संतोषच्या मृत्यूचे व्हायरल झालेले फोटोज हे अनाजीपंती कपट असू शकतं. बळी पडू नका. आपण जातीजातीत लढलो तर जुल्मी सत्तेचा फास आणखी आवळला जाईल ! कमकुवत पडत चाललेल्या कोरटकरी, सोलापूरकरी गिधाडांना बळ देण्यासाठी आपल्यात फुट पाडण्याचा कट असू शकतो.”
तसेच, “एवढंच लक्षात ठेऊया की खून झालेला एक तुमच्या-माझ्यासारखा ‘माणूस’ होता… आणि मारेकरी माजोरड्या सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असणारे आहेत! बास. वर्तमानात आपल्या भवताली याच दोन जाती आहेत. ‘सामान्य माणूस विरूद्ध सत्तेतले नराधम’… याच दोन जातीत सध्याचा संघर्ष सुरू आहे, हे मेंदूत कोरून घ्या.” असे त्यांनी म्हणले आहे.
यासह, “‘मेलेला मराठा’ विरुद्ध ‘मारणारे वंजारी’ अशी कळ ठरवून लावली जात आहे… गुन्हेगारांच्या म्होरक्याला वाचवण्यासाठीचं ते कारस्थान आहे. एक सत्य समजून घ्या की याच मारेकरी नराधमांनी याच बीडमध्ये अनेक वंजाऱ्यांचाही बळी घेतला आहे ! म्हणजेच ते जातीच्या नाही, तर सत्तेच्या कैफात धुंद आहेत. या खुन्यांपासून ते कोरटकरांपर्यंत सगळे एका माळेतले मणी आहेत.” असा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच, “… त्यामुळं संतोष देशमुख प्रकरणात बोलताना ‘मराठा-वंजारी’ अशा जातीवरून कमेंट करू नका. फक्त ज्या सत्ताधाऱ्यांच्या बळावर त्यांनी हे निर्घृण कृत्य केलं त्या सत्ताधाऱ्यांना टारगेट करा.” असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
दरम्यान, “बीड हे अत्यंत प्राचीन समृद्ध वारसा असलेलं ऐतिहासिक गांव आहे. त्याला हिणवण्यासाठी बिहारची उपमा देऊ नका. खुद्द महात्मा गांधींनी सत्याग्रहात संपूर्ण भारतातून जे पहिले सहा सत्याग्रही निवडले त्यात बीडचे हिरालाल सुखलालजी कोटेचा होते ! पानिपतात हरल्यानंतर निजामशाहीला पराभूत करून मराठ्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य आलं ते याच भूमीत. याच बीडमध्ये शंभर वर्षांपूर्वी अत्यंत दानशूर असलेल्या धोंडोजी किसन यांनी मुस्लिम बांधवांसाठी स्वखर्चानं मशीद बांधून दिली होती ! तो परिसर आजही धोंडीपुरा या नावानं ओळखला जातो.” असे किरण माने यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर, “अशा बीडला गुन्हेगारीचा कलंक लागणं हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. बीड हा महाराष्ट्राचा अभिमान होता. पुढे रहावा असे वाटत असेल तर जातपात बाजूला ठेवा. संतोष देशमुख प्रकरणात कोण आहेत, त्यांना कुणाचा वरदहस्त आहे हे जगजाहीर आहे. त्या सगळ्यांना अटक होऊन शिक्षा झाली पाहिजे यावर जोर द्या” अशी मागणी त्यांनी केली आहे.