वाईट वाटते, मला न्यय…!! कोरोनावर उपचार घेताना तडफडून मृत्यू पावलेल्या पत्रकार पांडुरंग रायकर यांचे शेवटचे शब्द..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यात टीव्ही 9 वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या पांडुरंग रायकर यांचं बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झालं. बुधवारी पहाटे १ वाजून ३३ मिनिटांनी त्यांनी whatsapp ग्रुपवर केलेला मेसेज चांगलाच व्हायरल होत असून कोरोना काळात प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या एका पत्रकाराला वेळेत उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागणं ही धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत एका व्हाट्सअप्प ग्रुपद्वारे आलेल्या संदेशात दिलेला तपशील पुढीलप्रमाणे –

पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर पांडुरंग रायकर यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले. 27 ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी केली जी निगेटिव्ह आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले.  मात्र तिथेही त्रास सुरू होता त्यामुळं त्यांची कोपरगावमधे एंटीजेन टेस्ट करण्यात आली जी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर रविवारी 30 ऑगस्टला रात्री त्यांना एम्ब्युलन्समधुन उपचारांसाठी पुण्यात आणण्यात आलं. पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केलं.

जंबो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती, त्यामुळं त्यांना दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमधे भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले. मंगळवारी त्यांची ऑक्सीजन पातळी 78 पर्यंत खाली गेली. त्यांना जंबो हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक एम्ब्युलन्सची गरज होती. अशी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी मंगळवारी प्रयत्न सुरू होते . मंगळवारी रात्री एक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर दुसरी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण त्या एम्ब्युलन्समधे डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत बारा – सव्वाबारा वाजले होते. पहाटे चारला एम्ब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता एम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आयसीयु मधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत असा फोन आला.

 

 

पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जंबो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात कार्डिॲक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. कोरोना संकटात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्वाचा असताना पुण्यासारख्या शहरात एखादी ऍम्ब्युलन्स उपलब्ध व्हायला ५ तासांपेक्षा अधिक वेळ लागावा हे प्रशासनाचं आणि आरोग्य यंत्रणेचं अपयश दाखवून देत आहेत. अशी वेळ पुन्हा येणार नाही यासाठी सर्वांनीच युद्धपातळीवर सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

WhatsApp Image 2020-09-02 at 12.06.43 PM

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment