Lok Sabha 2024 Results : महायुतीच्या दिग्गजांना ‘या’ नेत्यांनी घरचा रस्ता दाखवलाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात अबकी बार चारसो पार… तर महाराष्ट्रात 35 प्लसचं मिशन डोक्यात ठेवून मैदानात उतरलेल्या भाजपचा निकालात पुरता बाजार उठलाय… महाराष्ट्रात तर फोडाफोडी आणि दिल्लीतल्या नेत्यांची प्रचारात फौज लावूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दणका उडवून लावला… अनेक मतदारसंघातल्या निवडणुका घासून झाल्या… निकालही घासून लागले… पण खरे जायंट किलर ठरले ते 6 चेहरे… महायुतीतील मोठा भाऊ म्हणून तब्बल 28 जागांवर भाजपने निवडणूक लढवली… यातल्या फक्त नऊ जागांवर त्यांचा विजय झाला… आकड्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर भाजपचा स्ट्राईक रेट हा 33.33 टक्क्यांचा राहिला… पण भाजपची ही पाचर बसवली ती 6 नेत्यांनी… भाजपच्या दिग्गज नेत्यांना डोळे पांढरे करायला लावणारे हे सहा जायंट किलर नेमके कोण आहेत? महाराष्ट्रात भाजपचा आवाज सायलेंट मोडवर जाण्यामागे जे काही प्रमुख चेहरे आहेत त्यात यांचं नाव कसं येतंय? तेच पाहुयात

भाजपचा गेम करत सर्वात मोठे जायंट किलर ठरले ते बजरंग बाप्पा सोनवणे

धनुभाऊ सोबत असताना… भाजपने फुल टू ताकद लागलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या प्रस्थापित राजकारणाचा वारसा पुढे चालवणाऱ्या पंकजा मुंडे यांना अस्मान दाखवत भाजपला मोठा झटका दिला… दोन जातींच्या संघर्षावर लढल्या गेलेल्या निवडणुकीत मुंडे कुटुंबानं आपलं सारं सर्वस्व पणाला लावलं होतं. सगळे फॅक्टर प्लसमध्ये असताना देखील मुंडे यांचा पराभव होणं म्हणजे बीडच्या राजकारणातून मुंडे घराणं संपल्यात जमा आहे, असं म्हणता येऊ शकतं. शेवटी सतत पराभवाचे चटके सहन करून बाप्पांच्या अंगाला गुलाल लागलाच…

महायुतीच्या दिग्गजांना, या नेत्यांनी घरचा रस्ता दाखवलाय । Maharashtra Lok Sabha Result

पश्चिम महाराष्ट्रात जायंट किलर ठरलेलं दुसरं नाव म्हणजे निलेश लंके

प्रस्थापित विरुद्ध विस्थापित…या लाईनवर घासून झालेल्या दक्षिण नगरच्या निकालात बाजी मारली ती निलेश लंके यांनीच…राजकारण कुठेही जावो पण विखेंच्या बालेकिल्लाला कधीच धक्का पोहोचत नाही.. असं बोललं जायचं.. पण अगदी लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटातून शरद पवार गटात उडी घेतलेल्या… आमदारकीची एकही टर्म पूर्ण न झालेल्या निलेश लंके यांच्या खासदारकीवर काल मोहोर उमटली… मतदारसंघात आमदारांचा सरप्लस आकडा आणि हक्काची निर्णायक वोट बँक असतानाही सुजय विखेंचा गेम केला तो साध्यासुध्या निलेश लंके यांनी… बाकी विखेंना या धक्क्यातून उभारी यायला अजून बराच वेळ लागेल…

जायंट किलरच्या यादीतील तिसरं नाव येतं ते बाळ्यामामा म्हात्रे यांचं..

भाजपचे सलग दोन टर्मचे खासदार आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदावर असणाऱ्या दिग्गज कपिल पाटील यांचा आश्चर्यकारक पराभव करत शरद पवारांच्या बाळ्यामामाने खासदारकीचं मैदान मारलंच… एका मागून एक पक्ष बदलण्याचा शिक्का पडलेल्या बाळ्यामामांनी राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतल्यानंतर शरद पवारांसाठी ही जागा रेसमध्ये आली खरी, पण कपिल पाटील पडतील, असं कुणाला वाटलं नव्हतं. पण या सगळ्या राजकीय विश्लेषकांना तोंडावर पाडून जायंट किलर बाळ्यामामा आता दिल्लीत गेलेत..

440 चा करंट देत जायंट किलर ठरलेलं पुढचं नाव आहे ते कल्याण काळे यांचं…

1999 पासून सलग पाच टर्म खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांच्यासाठी जालन्याची खासदारकी म्हणजे डाव्या हाताचा मळ होता की काय अशी परिस्थिती होती…त्यामुळे खासदारकीचा सिक्सर मारून दिल्लीत जाण्यासाठी घोड्यावर बसलेल्या आणि केंद्रातील कॅबिनेट मंत्री असणाऱ्या दानवेंना कल्याण काळे यांनी घरचा रस्ता दाखवला.. तसं पाहायला गेलं तर काळे जरी जायंट किलर ठरले असले तरी यामागचे खरे सूत्रधार होते ते मनोज जरांगे पाटील…मराठा आरक्षणाचं वादळ जरांगेंनी ज्या आंतरवाली सराटी मधून पेटवलं होतं त्याच भागात जालना येत असल्यामुळे दानवे मोक्कार जरांगेंच्या तावडीत सापडले, असं म्हणायला इथं स्कोप उरतो…

यानंतरचं पुढचं नाव येतं ते प्रतिभा धानोरकर यांचं…

तसं पाहायला गेलं तर चंद्रपुरात हाताचा पंजाच येणार अशी चर्चा होती. पण भाजपच्या पहिल्या फळीतील मोठं नाव असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठीमागे पक्ष मोठी ताकद लावेल असा एक अंदाज होता… पण असं काहीही न घडता धानोरकर यांनी अगदी वन साईड खासदारकी मारली…त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकारणावर तुळशीपात्र ठेवल्यामुळे धानोरकर आता चंद्रपुरात जायंट किलर ठरले आहेत, असं म्हणायला हरकत नाही..

यातलं शेवटचं नाव येतं ते भास्कर भगरे यांचं…

प्रचाराच्या दिवसापासून ते एक्झिट पोलपर्यंत दिंडोरीत चर्चा होती ती फक्त भास्कर भगरे यांचीच… हीच गोष्ट निकालातही कायम ठेवत भाजपच्या सलग दोन टर्मच्या खासदार राहिलेल्या भारती पवार यांना भगरेंच्या तुतारीने शेवटी मात दिलीच… भगरेंनी गुलाल लावल्यामुळे शरद पवारांची तुतारी पश्चिम महाराष्ट्रसोबत खानदेशातही वाजली…

बॉटम लाईन काय तर महाविकास आघाडीच्या या सहा शिलेदारांनी अगदी मतदानाच्या दिवशीच जायंट किलर ठरत भाजपाच्या पायाखालची वाळू सरकवलीय…ह्याचाच परिणाम म्हणून की काय आता भाजपात मोठी उलथापालथ होऊन फडणवीसांचं उपमुख्यमंत्रीपदही धोक्यात आलय…असो बाकी आघाडीच्या या सहा जायंट किलर बद्धल तुमचं काय मत आहे? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा