Maharashtra Budget 2025 : सर्वसामान्यांसाठी खुशखबर! येत्या 5 वर्षांत वीजदर होणार स्वस्त; अजित पवारांची मोठी घोषणा| उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. खास म्हणजे, अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी, येत्या पाच वर्षांत वीजदर होणार स्वस्त, अशी देखील घोषणा केली आहे.
वीज दराबाबत बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की, महावितरण कंपनीने पुढील पाच वर्षांसाठी वीजदर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे पाठवला आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन आणि कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे वीज खरेदी खर्चात मोठी कपात होईल. त्यांनी अंदाज वर्तवला की, यामुळे राज्य सरकारला तब्बल १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत होईल. परिणामी, महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर हे इतर राज्यांच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे.
याबरोबर, शेतकऱ्यांसाठीही अनेक घोषणा करण्यात आल्या. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,” “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यांवर सरकार लवकरच महत्त्वाचे निर्णय घेणार आहे, असे संकेतही अजित पवार यांनी दिले आहेत. (Maharashtra Budget 2025)
दरम्यान, अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी “महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास लांबणार नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे,” असे ठामपणे सांगितले. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी, अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करत हा अर्थसंकल्प लोककल्याणाच्या दृष्टीने तयार करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, महायुती सरकारला जनतेने विधानसभा निवडणुकीत दिलेला कौल लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर, “विकासाची कामं केली म्हणून आम्ही पुन्हा आलो. 2047 पर्यंत भारताला विकसित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्येय ठेऊन आहेत.शाश्वत विकासाची रूपरेषा पुढे घेऊन आम्ही चालत आहोत महाराष्ट्र आता थांबणार नाही. थेट गुंतवणूक राज्यात आता केली जात आहे” असे अर्थसंकल्प(Maharashtra Budget 2025) सादर करताना अजित पवार म्हणाले.