मंत्री-मुख्य सचिव वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मंत्री व सचिवांमध्ये खडाजंगी झाल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. असा कोणताही वाद झालेला नाही. मंत्रिमंडळ बैठकीत बाहेरचं कोणी येत नाही. मग वाद झाला म्हणता तर तो बघितला कुणी?, असा उलट सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या विभागाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता आणला गेल्याचा आरोप केल्याचे सांगितले आहे. त्याचा उल्लेख करत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मंत्रिमंडळ हे राज्याच्या हिताचं काम करत असतं, तिथे कुणी मारामाऱ्या करायला येत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये झालेल्या अतिशय मह्त्तवाच्या बैठकीनंतर एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. यावेळी, उमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचीसुद्धा उपस्थिती होती.

बैठकीत नेमकं काय घडलं?
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रब्बी हंगामातल्या गहू खरेदीचा प्रस्ताव आयत्यावेळी समोर आला. कोणत्याही खात्याचा प्रस्ताव आणताना त्या खात्याच्या मंत्र्यांना तो प्रस्ताव दाखवावा लागतो. मंत्र्याच्या मान्यतेनंतर तो प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत येतो. मात्र, अन्नपुरवठा खात्याचा विषय मंत्री छगन भुजबळ यांच्या मान्यतेशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आला. त्यामुळे मुख्य सचिव अजोय मेहता यांची मंत्र्यांनी कानउघाडणी केली. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मुख्य सचिवांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हा अत्यंत चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचं म्हणलं. राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनीही या प्रस्तावावर संबंधित मंत्र्यांची सही नसताना, हा विषय बैठकीसमोर आलाच कसा? असा सवाल केला. मुख्य सचिव आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नव्हतं.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री आणि मुख्य सचिवांमध्ये हा वाद सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चटकन कोणतीही भूमिका न घेता सर्व प्रकरण ऐकून घेतलं. त्यामुळे मुख्य सचिवांबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, येत्या ३० जून रोजी मुख्य सचिवांची मुदत संपत आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुख्य सचिवांबाबत नाराजी आणि मुख्यमंत्र्यांचं मौन यामुळे अजोय मेहतांना मुदतवाढ मिळणार का? याबाबत चर्चा सुरू आहे.

मुख्य सचिव अजोय मेहता यांची याआधीही मंत्रीनी केल्या आहेत तक्रारी
याआधीही मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी मुख्य सचिवांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनसंदर्भात जिल्हा स्तरावर निर्णय होत असताना पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता परस्पर जिल्हाधिकारी आणि मुख्य सचिव निर्णय घेतात, अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. काही मंत्र्यांनी तर नागपूरवरून मुंबईत येऊन मुख्य सचिवांच्या कारभारावरून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. यासंबंधात पुढे काहीही न झाल्यामुळे आता मुख्य सचिव विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री हा संघर्ष वाढताना दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment