अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021: अण्णा हजारे, पोपटराव पवार, विखे-थोरातांची प्रतिष्ठा पणाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली आहे. त्यातील 53 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक झाली  उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पण, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा विचार केला तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यापासून ते भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे. (Prestige election for many veterans in Ahmednagar district)

राळेगणसिद्धी, हिवरेबाजारमध्ये 30 वर्षांनी निवडणूक
आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झाली आहे. अण्णा आणि पवारांना बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यात अपयश आल्याने या दोघांच्याही वर्चस्वासाठी यंदा मोठा धक्का बसलाय.

हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार यांचा शब्द अंतिम मानला जायचा. त्यामुळे 7 सदस्यीय ग्रामपंचायत 1989 पासून बिनविरोध राहिली. पण यंदा ही परंपरा खंडीत झाली असूनस सातही जागांसाठी निवडणूक झाली. दुसरीकडे राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आमदार निलेश लंके यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. त्यांच्या या मोहिमेला यशही आले होते. गावकऱ्यांची बैठक घेऊन बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी माशी शिंकली असून अण्णा आणि लंके यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.

विखे-पाटील आणि थोरातांमध्ये 12 गावात संघर्ष
राधाकृष्ट विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात संगमनेरमधील 14 ग्रामपंचायतींमध्ये सघर्ष पाहायला मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील 14 गावं विखे पाटलांच्या शि्रडी मतदारसंघात येत असल्यानं या ग्रामपंचायतींमध्ये विखे समर्थक आणि थोरात समर्थकांमध्ये ग्रामपंचायतीचा आखाडा रंगला होता.

विखे-थोरात आमनेसामने लढत
चिंचपुर बुद्रुक, खळी, दाढ खुर्द, ओझर खुर्द, कनोली, चनेगाव, झरेकाठी, शेडगाव, प्रतापपूर, मनोली, प्रिंपीलौकी, आजमपुर, औरंगपुर, शिबलापुर, या 14 गावांमध्ये थेट विखे-थोरात लढत झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी आज कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

Leave a Comment