मराठा समाज दुधखुळा नाही; धूळफेक करू नका : प्रवीण दरेकर यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकारमधील शिष्ट मंडळासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच त्यांना पत्र दिले. महाविकास आघाडी सरकारच्या शिष्ट मंडळाने राज्यपालांना दिलेल्या पत्रा संदर्भात व मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आघाडी सरकार व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “मराठा समाज हा काय दुधखुळा नाही, त्यांच्या डोळ्यात महाविकास आघाडी सरकारकडून धूळफेक करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो त्यांनी करू नये”, अशी दरेकरांनी टीका केली.

यावेळी दरेकर म्हणाले, “मुख्यमंत्री महोदय, २ मिनिटात २ परस्पर विरोधी भूमिका कशा हो मांडता? एकतर मराठा आरक्षण कायदा ‘एकमताने केलेला व योग्य’ आहे,असं तरी म्हणा किंवा कायदा ‘टिकणारा नव्हता’ असं तरी म्हणा! युतीत असताना एक बोलणारे शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे.”

केंद्रीय मागासवर्ग आयोग हा स्वायत्ता आहे. मागासलेल्या जातीत मागासलेपण आहे का? याची खातरजमा करण्याचे काम केंद्रीय मागासवर्ग आयोग करणार आहे. त्यानंतर ते केंद्र सरकारला सांगेल. त्यामुळे केंद्र सरकार कधीही या आयोगामध्ये हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे या आघाडी सरकारकडून केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या व पत्राच्या नावाखाली पळवाट काढण्याचा प्रकार केला जातो आहे.

एखादे शिष्टमंडळ घेऊन राज्यपालांना पत्र देता येत का? एखाद पत्र दिलं कि मराठा समाजाला आरक्षण मिळते का? राज्याला मराठा आरक्षण देता येणे शक्य असते तर राज्यपालांनी तसे केले असते. मुख्यमंत्र्यांकडून कायदासंदर्भात विरोधाभास निर्माण करणारे वक्तव्य केले जात आहे. अशा प्रकारच्या भुलथाफा जर आघाडी सरकारकडून देण्याचं काम केलं जात असेल तर त्यांनी लक्षात घ्यावं कि मराठा समाज हा दुधखुळा नाही. या समाजातील अनेक नेते हे अभ्यासू आहेत. असेही शेवटी दरेकर म्हणाले.

Leave a Comment