औरंगाबाद | गतवर्षी कोरोनाचा संसर्ग पसरण्यात कृषी उत्पन्न बाजार समितीतील गर्दी कारणीभूत ठरली होती. यंदाही कोरोना संसर्ग वाढत असताना तेच चित्र दिसत आहे. बाजार समिती व महापालिका प्रशासन या गर्दीवर आळा घालण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे येथूनच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मार्च २०२१ पासून कोरोनाने पुन्हा एकदा आपले पाय पसरायला सुरुवात केली. यात कृषी उत्पन्न बाजार समितीदेखील तितकीच महत्त्वाची ठरत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नियमांतर्गत बाजार समितीला परवानगी द्यावी, अशी मागणी सभापती पठाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यानुसार, सकाळी ११ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली. परंतु हे करत असताना ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांकडून त्रिसूत्रीला पुन्हा एकदा केराची टोपली दाखविल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रशासनाने याकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. बाजार समितीत येणाऱ्या विक्रेते व ग्राहकांना सामाजिक अंतर ठेवा, मास्क घाला आदी सूचना दिल्या जात आहेत. यासाठी ठिकठिकाणी भोंगे लावण्यात आले आहेत. या भोंग्यातून कायम या सूचनांचे प्रसारण सुरु असते. तरीही याकडे दुर्लक्ष करत भाजी बाजार पूर्ण क्षमतेने सुरु असतो. बहुतांश लोकांनी घातल्याचे चित्र येथे सामान्य झाले आहे. प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर कोरोना संसर्गवाढीसाठी पुन्हा एकदा जाधववाडी बाजारपेठ जबाबदार ठरू शकते.