कौटुंबिक वादातून विवाहित महिलेने पोटच्या 4 मुलांसह उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील घुंगर्डे हादगाव याठिकाणी एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने आपल्या पोटच्या 4 मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. कौटुंबिक वादातून या महिलेने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी पाचही जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे.

गंगासागर अडाणी असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याचबरोबर 13 वर्षीय भक्ती, 11 वर्षीय ईश्वरी, 9 वर्षीय अक्षरा आणि 7 वर्षीय मुलगा युवराज अशी मृत मुलांची नावे आहेत. आज सकाळी ही खळबळजनक घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी पती ज्ञानेश्वर अडाणी याला अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास मृत गंगासागर या आपल्या तीन मुली आणि एका मुलाला घेऊन शेतात गेल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्या शेतातच होत्या, गावातील काही लोकांनी त्यांना शेतात पाहिलं. पण त्यांनतर थोडासा काळोख पडताच मृत गंगासागर या चारही मुलांसह अचानक गायब झाल्या.

मात्र रात्र झाली तरी गंगासागर आपल्या मुलांना घेऊन घरी परतल्या नाहीत म्हणून पती ज्ञानेश्वर अडाणी आणि गावातील काही नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत या पाच जणांची शोधाशोध सुरु केली. या सर्वांनी परिसरातील सर्व विहिरी आणि जायकवाडी डावा कालवा परिसर पिंजून काढला. मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर आज सकाळी या पाचही जणांचे मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आले. या माया लेकरांच्या आत्महत्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. गोंदी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment