हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुमच्या घरात कोणी कॅन्सरग्रस्त किंवा मधुमेहाचा रुग्ण असेल तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. मधूमेह, हृदयरोग आणि कर्करोग यासारख्या गंभीर आजारांसाठी लागणाऱ्या औषधांच्या किमती लवकरच वाढण्याची (Medicine Price Increased) शक्यता आहे. या श्रेणीतील औषधांच्या किमती १.७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. महागाईचा परिणाम हा औषधांच्या किमतीवरही झालाय हेच यातून दिसून येतेय. औषधाच्या किमती वाढल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसण्याची शक्यता आहे.
कच्च्या मालाची किंमत आणि इतर खर्च दररोज वाढत आहे- (Medicine Price Increased)
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) चे सरचिटणीस राजीव सिंघल यांनी याबाबत म्हंटल कि, यामुळे औषध उद्योगाला किमती वाढविण्यास मदत होईल, कारण कच्च्या मालाची किंमत आणि इतर खर्च दररोज वाढत आहेत, ज्यामुळे उद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळेल. बाजारात औषधांच्या नवीन किमती दिसण्यासाठी दोन ते तीन महिने लागतील, कारण कोणत्याही परिस्थतीत मार्केट मध्ये सुमारे ९० दिवसांची औषधे उपलब्ध असतात. तीन महिन्यांचा साठा आधीच असल्याने सुरुवातीला औषधांच्या दरवाढीचा फटका रुग्णांना बसणार नाही.
संसदेच्या रसायने आणि खतांवरील स्थायी समितीने केलेल्या अभ्यासात आढळून आलं होतं की औषध कंपन्या वारंवार औषधांच्या किमती मर्यादेपेक्षा जास्त वाढवून नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे ६ मार्च २०२५ पर्यंत, राष्ट्रीय औषधनिर्माण किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) औषध (दर नियंत्रण) आदेश (डीपीसीओ), २०१३ च्या परिच्छेद २० अंतर्गत उल्लंघनाच्या ३०७ प्रकरणांची नोंद केली आहे, जे अनुसूचित नसलेल्या औषधांच्या किंमती वाढ (Medicine Price Increased) नियंत्रित करते. हे उल्लंघन औषधांच्या किमतींमध्ये अनियंत्रित वाढ आणि त्यांचा क्षमतेवर होणारा परिणाम याबद्दल वाढती चिंता अधोरेखित करतात.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ३६ जीवनरक्षक औषधांवरून कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा केली होती. कर्करोग, दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी सरकारने ३६ जीवनरक्षक औषधांवर मूलभूत कस्टम ड्यूटी पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे,” असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटलं होतं.