जशास तसे उत्तर देवू : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा सत्यजित पाटणकरांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | मंत्री पदासाठी तेवढेच कर्तृत्व ही लागते आणि त्यासाठी जनतेत मिसळावे लागते, सर्व सामान्य जनतेची कामे तळमळीने करावी लागतात, त्याला कोणाच्याही मेहरबानीची गरज लागत नाही. सातारा जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांना उठता बसता माझ्या मंत्री पदाची भीती का वाटते मला माहित नाही. मात्र मला मंत्रीपद मेहरबानीवर मिळाल्याची भाषा करणारे सत्यजितसिंह आपल्यावर तर अनेक वर्षांपासून ज्या पक्षाची मेहरबानी आहे. मग त्या मेहरबानीवर आपण आमदार का बनू शकला नाही ? तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने तुमची निष्क्रियता ओळखूनच धनशक्तीच्या जोरावरील तुमची सत्तेची मस्ती उतरवत आपल्याला घरी बसवले असून सात वर्षापूर्वीच तुमचा आवाज बंद केल्याचे भान राखावे, असे प्रतिउत्तर गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिले. ते दौलतनगर ता.पाटण येथे पत्रकारांशी बोलत होते.

गृहराज्यमंत्रांचा पराभव केलेल्या पाटणकरांनी निकाल लागताच दिली 'हि' प्रतिक्रिया; म्हणाले...

ना. शंभूराज देसाई म्हणाले की, ज्यांनी आजपर्यंत वर्षानुवर्षे जिल्हा बँकेचे संचालकपद घेऊन ही केवळ हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून पाटण तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान केले. आता घराणेशाहीने पुन्हा त्याच पदावर मुलाला बसवून पुन्हा मागचे तेच पुढे होणार आहे. त्यामुळे आमच्या मंत्रिपदाची जास्त काळजी तुम्ही करण्याची गरज नाही. मंत्रीपद हे पैशाचा माज दाखवून कधी मिळत नाही ते मिळविण्यासाठी जनतेचे प्रेम, कर्तृत्व आणि पक्षावरील निष्ठा लागते. याची माहिती आपण आपल्या वडिलांकडून घेतली असती तर अधिक बरे झाले असते. मात्र अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्यांना काय समजणार ?

मंत्री देसाई म्हणाले, राज्यातील आघाडी सरकार हे तिन्ही पक्षांचे सरकार आहे. केवळ एका पक्षाचे हे सरकार नाही, याचे भान ठेवून आपली वक्तव्ये करावीत. मगच कुणाच्या मेहरबानीवर कुणाला मंत्रीपदे मिळाली असली, बेताल वक्तव्ये करावीत. जिल्हा बँकेची केवळ 102 मतदारांची निवडणूक जिंकली म्हणून आपण पाटण मतदार संघातील सर्वसामान्य जनतेची निवडणूक जिंकली नाही. त्यामुळे आपला आत्ताच इतका थयथयाट बरा नाही. अजून बऱ्याच निवडणुका व्हायच्या आहेत. तालुक्यातील निवडणुका आमच्यासाठी काही नविन नाहीत. आम्हीही या निवडणुकांमध्ये तुमच्याशी दोन हात करायला माझ्या कार्यकर्त्यांसह तयार आहोत.

सातार्‍यात राष्ट्रवादी धोक्यात? शशिकांत शिंदेंनी केले हे गंभीर आरोप

पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पक्षाची निष्ठा सोयीनुसार गुंडाळून ठेवणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकविण्याची गरज नाही. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये आतापर्यंत तुम्ही कोणा-कोणाला खुणावले हेही तालुक्याने पाहिले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयाची खात्री असताना, मग तुम्ही ते मतदार एक महिनाभर वेगवेगळया ठिकाणी का फिरवत होता. त्यांना दिपावलीसारखा मोठा सण असतानाही कुटुंबियांसमवेत न ठेवता त्यांच्या हातामध्ये गंडेदोरे का बांधले हेही जनतेला सांगीतले तर बर होईल. त्यामुळे केवळ 14 मते घेऊन विजयाने हुरळून गेलेल्या सत्यजितसिंह यांना माझ्या मंत्री पदाचा राजीनामा मागण्या एवढी आपली राजकीय उंची तरी आहे का ? असा हल्लाबोल मंत्री देसाई यांनी केला. तसेच दोन हात करण्याची भाषा आम्हांला करू नये, आम्हीही यापुढे जशास तसे उत्तर द्यायला नेहमीच तयार आहे, असा इशाराही ही शेवटी मंत्री देसाई यांनी शेवटी दिला.

Leave a Comment