अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांसाठी आम्ही जात, पात, धर्म, राजकीय विचार सर्व बाजूला ठेऊन एकत्र येत शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय आता थांबायचं नाही असा निर्धार करीत बच्चूभाऊ कडू (Bachhu Kadu) यांनी ‘७/१२ कोरा कोरा कोरा’ यात्रेला सुरुवात केली आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांची सरकारने दखल घ्यावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू, अशा थेट इशाराच मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिला. तर आमच्या शेतीमाला भाव द्या, आम्हाला कुठल्याही योजनांचे पैसे नकोत. जर आमच्या शेतीमालाला जर योग्य भाव मिळाला तर आम्हीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना दर महिन्याला 5000 देऊ…, असे बच्चू कडू यांनी म्हटले.
देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली ‘७/१२ कोरा कोरा कोरा’ यात्रा दारव्हा तालुक्यातील लालखिंड येथे आज पोहचली. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पदयात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या यात्रेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाठिंबा दर्शविला. यावेळी नांदगावकर म्हणाले की, बच्चूभाऊ कडू यांनी सरकारकडे ज्या सतरा मागण्या केल्या आहेत त्या मागण्या अतिशय योग्य आहेत. कष्टकरी शेतकरीराजाला मदत झालीच पाहिजे. त्याला पीकविमाचे पैसे मिळाले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं कर्जमाफी झाली पाहिजे. आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी घालवणारे बच्चू कडू यांचा पाठीचा कणा एकदम ताठ आहे. ताठ कण्याचे आबू लढाऊ बाण्याचे माझे मित्र बच्चू कडू आहेत. ज्यावेळेला हा माणूस उन्ह, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पायी यात्रा काढतो अशा माणसाला पाठिंबा हा द्यायलाच पाहिजे, असे बाळा नांदगावकर यांनी यावेळी म्हंटले.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, बाळा नांदगावकरांना पाहताच सिमेंटच्या जंगलातला माणूस शेतीच्या जंगलात आलाय. मनसेचे बाळा नांदगावकर हे माझे मित्र असून आम्ही दोघेजण विधानसभेत एकत्रित होतो. पक्ष, जात आणि धर्म कोणताही असू दे मात्र राबणारी जात मात्र, शेतकरी, मजुराची आहे हे एकदा दाखवायला पाहिजे. या यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. आम्ही उभारलेला हा लढा शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांच्या एकजुटीसाठी आहे. त्यामुळे या लढ्यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. जात, पात बाजूला ठेवत शेतकऱ्यांसाठी एकत्रित येत असून मत कोणाला पण द्या पण शेतकऱ्यांसाठी एकत्रित व्हा, असे आवाहन बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना केले.




