ठाकरे-पवार पॅटर्न भाजपासाठी भविष्यात धोक्याची घंटा! माजी खासदाराचं भाकीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । काल दादरच्या ठाकरे स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्यात चर्चा झाली. यावेळी राज्यात ठाकरे-पवार पॅटर्न राबवण्याबाबत खलबतं झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. ही घटना ताजी असतानाच भाजप पुरस्कृत माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी ठाकरे-पवार पॅटर्नवर भाष्य केलं आहे.

आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असून त्यांचं जागा वाटपही निश्चित झाल्याचा दावा करतानाच भाजपसाठी मात्र हा नवा पॅटर्न धोकादायक ठरणार असल्याचं काकडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. राज्यात ठाकरे-पवार पॅटर्न अस्तित्वात येणार आहे. हा पॅटर्न लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राबवला जाणार असून भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे, असं भाकीत माजी खासदार संजय काकडे यांनी वर्तवलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात ठाकरे-पवार पॅटर्नच्या चर्चेने जोर धरला आहे. राज्यात ठाकरे-पवार पॅटर्न अस्तित्वात आणण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून जोरदार बैठका सुरू आहेत.

यावेळी त्यांनी आमचं सरकार आमच्या कर्मानं गेलं, तसं हे सरकारही त्यांच्या कर्मानं जाईल, असं सांगतानाच सरकार पाडायला हिंमत लागत नाही, सर्व नंबर गेमचा खेळ असतो, असं ते म्हणाले. आमचं सरकार असताना शिवसेना तेव्हा खिश्यात राजीनामे घेऊन फिरायची. आता काय झालं? असा सवाल करतानाच काहीही असो पण या नव्या पॅटर्नमुळे आम्हाला सावध राह्यला हवं, असं ते म्हणाले.

‘ठाकरे-पवार पॅटर्न’च्या पायाभरणीला सुरुवात
नुकतीचं दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. खरंतर ही बैठक दोन्ही पक्षांतील स्थानिक पातळीवरचा तणाव दूर करण्यासाठी होती मात्र, या चर्चेतून भविष्यातील ‘ठाकरे-पवार पॅटर्न’ची पायाभरणी झाल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांनी एकत्रच राहायला हवं. यात दोन्ही पक्षांचं हित आहे. केवळ रायगड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची एकजूट दिसायला हवी. त्यासाठी आपसात समन्वय असला पाहिजे, असा या चर्चेतला सूर होता. राज्यात स्थानिक पातळीवर वा राज्य पातळीवर होणाऱ्या कोणत्याही निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रपणे लढल्यास त्याचे परिणाम आघाडीसाठी सकारात्मक असतील, असे मत पुढे येताच दोन्ही पक्षांचं त्यावर एकमत झालं. त्यामुळेच रायगडचा तीढा सोडवता सोडवता ‘ठाकरे-पवार’ पॅटर्नची नांदी झाली आणि येत्या काळात हा पॅटर्न भाजपसाठी तगडे आव्हान उभे करेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment