अयोध्येतील पराभवानंतर भीष्म पितामहांनी भाजपला सुनावले खडेबोल; म्हणाले, श्रद्धेच्या ठिकाणाला….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदींची लाट, हिंदुत्त्वाचा नारा आणि महत्वाची बाब म्हणजे राम मंदिर बांधूनही भाजपला अयोध्येत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. समाजवादी पार्टीच्या अवधेश प्रसाद यांनी भाजप उमेदवार लल्लू सिंग यांचा पराभव केला. भाजपच्या या पराभवानंतर महाभारतातील पितामह भीष्म म्हणजेच अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोदी सरकारला अप्रत्यक्षरीत्या सुनावलं आहे. श्रद्धेच्या ठिकाणाला पर्यटन स्थळ होऊ देऊ नका असं मुकेश खन्ना यांनी म्हंटल आहे. मुकेश खन्ना यांनी सोशल मीडिया वरील हि पोस्ट देशभरात चर्चेचा विषय बनली आहे.

मुकेश खन्ना यांनी पोस्ट काय आहे?

मुकेश खन्ना यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हंटल, अयोध्या निवडणुकीतील पराभवातून हे शिकायला हवे की, भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचे जीवनही भव्य बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोटींच्या बजेटमध्ये तेथील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काही कोटी रुपये ठेवणे आवश्यक आहे. राम मंदिर असो, चार धाम असो किंवा जयपूर जवळील खातू शाम मंदिर असो. श्रद्धेच्या ठिकाणाला पर्यटन स्थळ होऊ देऊ नका. लोकही तिथे राहतात, त्यांचीही काळजी घ्यायला हवी अस म्हणत मुकेश खन्ना यांनी एक प्रकारे नाव न घेता भाजपवर टीका केली आहे.

यानंतर मुकेश खन्ना यांनी आणखी एक पोस्ट केली. त्यात ते म्हणतात. ‘सबका साथ सबका विकास’ – मोदीजींनी दिलेला त्यांचा आवडता नारा आहे. मात्र जनतेबरोबरच त्यांच्या पक्षाचे निवडून आलेले खासदार, आमदार, नगरसेवक यांनाही हे लागू व्हायला हवे. दोन चेहऱ्यांशिवाय टीव्ही आणि प्रसिद्धीमध्ये कोणाचाच चेहरा दिसत नाही. का ? तेही आपल्यासोबत असले पाहिजेत, देशाचा विकास करायचा असेल तर तो दिसला पाहिजे. यावेळी निवडणूक निकाल अपेक्षेविरुद्ध लागण्याचे हेही एक प्रमुख कारण आहे. पक्षाने एकत्र काम केल्यास विजय निश्चित आहे. पण प्रत्येकाने आपापल्या परीने सर्वोत्तम कामगिरी केली नाही तर पराभव निश्चित आहे. मला आशा आहे की मोदीजी आणि अमितजी माझ्या या सल्ल्याकडे थोडे लक्ष देतील.