Mumbai Local Update : मुंबईतील गर्दीने भरलेल्या लोकल प्रवासात आता लवकरच ‘मेट्रो अनुभव’ मिळणार आहे! पश्चिम रेल्वेने एक अभिनव पाऊल उचलत मेट्रोप्रमाणे नियंत्रित प्रवेश, तिकीट तपासणी आणि सुरक्षा चाचणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रायोगिक प्रकल्प सुरुवातीला 12 ठिकाणी राबवला जाणार असून यात मुंबईतील अंधेरी, बोरिवली आणि वांद्रे टर्मिनस स्थानकांचा समावेश आहे.
रेल्वे प्रशासनाने ही यादी रेल्वे बोर्डाला सादर केली आहे आणि यशस्वी अंमलबजावणीनंतर मुंबईतील इतर स्थानकांवरही या नव्या योजनेचा विस्तार केला जाईल.
प्रवासात काय बदलणार ? (Mumbai Local Update)
मेट्रोसारखे गेटेड एंट्री पॉईंट
तिकीट व सुरक्षा तपासणी एकाच डेकवर
बिनतिकीट प्रवासी आणि अनावश्यक गर्दीवर लगाम
प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि सुसंगत अनुभव
काय असेल नव्या योजनेचं स्वरूप?
रेल्वेकडून दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पात प्रवाशांना मेट्रो प्रमाणेच तिकीट खरेदी, तपासणी आणि प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ठराविक मार्गाने जावे लागणार आहे. यासाठी काही स्थानकांवर डेक उभारले जात असून तिथेच सगळ्या सुविधा उपलब्ध असतील. यामुळे स्थानकावरील गोंधळ कमी होऊन प्रवास अधिक नियोजित होईल.
प्रायोगिक प्रकल्पासाठी निवडलेली प्रमुख स्थानके
- अंधेरी
- बोरिवली
- वांद्रे टर्मिनस
(तसेच गुजरात विभागातील 9 स्थानकं)
“प्रवाशांना मेट्रोसारखी सुरक्षितता, सोय आणि अनुभव देणे, त्याचबरोबर रेल्वे स्थानकांवरील अव्यवस्था दूर करणे.” विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे या बदलामुळे प्रवास केवळ सोयीस्करच नव्हे, तर सुरक्षित आणि बिनधास्त होणार आहे. मुंबई लोकल आता स्मार्ट होणार
मुंबई मेट्रोमुळे वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल
मुंबई मेट्रो ही मुंबई शहरासाठी एक आधुनिक आणि स्मार्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठरली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या आणि प्रचंड वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी मुंबई मेट्रोने एक मोठा बदल घडवून आणला आहे. मेट्रो मार्गांवर अत्याधुनिक डबे, स्वच्छता, एसी सुविधा, आणि सुसज्ज प्लॅटफॉर्म्समुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळतो. विशेषतः महिलांसाठी स्वतंत्र डबे, दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था, आणि प्रत्येक स्थानकावर तिकीट तपासणी व सुरक्षा तपासणी यामुळे मेट्रोला अधिक सुरक्षित ठिकाण मानले जाते. ‘वन टोकन – वन एंट्री’ प्रणालीमुळे बिनतिकीट प्रवासावर नियंत्रण ठेवण्यात यश आलं आहे. याशिवाय मेट्रो स्टेशन परिसरात व्यावसायिक गाळे, फूड कोर्ट्स आणि मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीही प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. मुंबई मेट्रो केवळ वाहतुकीचा पर्याय न राहता आता शहराच्या गतिशीलतेचा अविभाज्य भाग बनली आहे, आणि याच यशस्वी मॉडेलवर आता पश्चिम रेल्वेही पावले टाकत आहे.