Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : ‘या’ वाहनांना प्रवेश नाकारण्यात येतोय; अधिकारी ठेवतायंत करडी नजर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गाच्या (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आले होते. मात्र उद्घाटनानंतर अवघ्या 100 दिवसांतच समृद्धी मागमार्गावर तब्बल 900 अपघात झाल्याची माहिती समोर आली. यामुळे सुरक्षा अधिकारी वाहतूक पोलिसांनी सावध होऊन कडक उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यानुसार, ज्या टायरची झीज झाली आहे अशा वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश नाकारण्यात येत आहे.

गेल्या तीन दिवसांत, अधिकाऱ्यांनी या एक्स्प्रेस वेवर तब्बल 500 “अनफिट” वाहनांना प्रवेश नाकारला आहे. या गाड्यांचे टायर योग्य नव्हते, म्हणजेच टायर इतके जीर्ण झाले होते, झिजले होते कि ते 520 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्याच्या स्थितीत नव्हते. तर काही गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी असल्याने त्या गाड्यांना सुद्धा प्रवेश नाकारण्यात आलाय.

अतिवेगावर अधिकाऱ्यांची करडी नजर –

दुसरीकडे, या महामार्गावरून प्रवेश करताना गाड्यांचा अतिवेग रोखण्यासाठी सुद्धा अधिकाऱ्यांकडून पाळत ठेवली जात आहे. त्यानुसार, एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या प्रवेशाची वेळ आणि बाहेर पडण्याची वेळेची नोंद अधिकाऱ्यांकडून ठेवली जात आहे. त्यानंतर ते गाड्यांच्या ऍव्हरेज वेगाचे विश्लेषण करत असून परवानगी असलेल्या वेग मर्यादेपेक्षा (120 किमी प्रतितास) जास्त वेगाने गाडी चालवल्यास बाहेर पडण्याचे गेट आपोआप लॉक होईल आणि सायरन वाजवला जाईल, असे अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.

दरम्यान, नागपूर-मुंबई समृद्धी एक्सप्रेसवेमुळे (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) विदर्भाला नवी संजीवनी मिळाली आहे. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातून जात आहे. या मागमार्गामुळे नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास 16 तासांवरून आठ तासांपर्यंत कमी होईल. 55335 कोटी रुपयांच्या एकूण प्रकल्पात 5 उड्डाणपूल, 33 मोठे पूल, 274 छोटे पूल, 8 रेल्वे ओव्हर ब्रिज, 25 इंटरचेंज, 6 बोगदे, 189 अंडरपास, हलक्या वाहनांसाठी 110 अंडरपास, 209 अंडरपास आणि 8 पशूंसाठी 209 अंडरपास यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन पार पडले होते.