मी अनुसूचित जातीची असल्याने पोलिसांनी मला….; नवनीत राणांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान करत, सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तुरुंगात मिळालेल्या वागणुकीबद्दल गंभीर आरोप केले आहेत. अनुसूचित जातीची असल्याने मला रात्रभर पाणीही दिलं नाही असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

नवनीत राणा यांनी बिर्ला यांना लिहीलेल्या पत्रात अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी लिहिले की, “मला 23 एप्रिल 2022 रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मी संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढली. मी पिण्यासाठी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही. पाणी मागितल्यामुळे मला जातीवाचक शिवीगाळ केली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला.

त्या पुढे लिहीतात की, “मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आमंत्रित केले होते. माझा हा उपक्रम मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नव्हता. पण, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करुन आम्ही हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेतला आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार नसल्याचे सांगितले. पण, त्यानंतरही मला आणि माझ्या पतीला घरात कैद केले.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सार्वजनिक जनादेशाचा अपमान करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली. यावरुन ते हिंदुत्वापासून पूर्णपणे विचलित झाल्याचे दिसत आहे.

शिवसेनेत हिंदुत्वाची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याच्या आशेने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. कोणत्याही प्रकारचा धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आमचा हेतू नव्हता,” असेही राणा यांनी पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment