New Dam In Satara : साताऱ्यात तयार होणार नवं धरण; 3 तालुक्यांचा पाणीप्रश्न मिटणार

New Dam In Satara mahabaleshwar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन New Dam In Satara: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. साताऱ्यात लवकरच नवीन धरण तयार करण्यात येणार आहे. महाबळेश्वर भागात नवीन धरण बांधण्याचा निर्णय सरकार कडून घेण्यात आला आहे. सोळशी धरण असं या धरणाचे नाव असून या नवीन प्रकल्पामुळे माण, फलटण आणि वाई या दुष्काळी भागातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.

सोळशी धरण बांधणीसाठी काल आढावा बैठक घेण्यात आली. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला मंत्री जयकुमार गोरे, मकरंद पाटील, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांनी उपस्थिती लावली. या बैठकीत सातारा जिल्ह्याला नवे धरण मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नवीन धरण होणार ही बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी असून, या धरणामुळं (New Dam In Satara) मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि कृषी उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल आणि आपोआपच शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे.

हजारो हेक्टर शेती ओलीताखाली येणार- Dam In Satara

तस बघितलं तर माण, फलटण आणि वाई हे तिन्ही तालुके मुख्यतः कोरडवाहू असून, पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणीच नसल्याने शेती करताना शेतकऱ्यांना फार मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. मात्र नवीन धरण तयार झाल्यानंतर हजारो हेक्टर शेती ओलीताखाली येणार असून, शेतकऱ्यांना वर्षभर पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे. एकूणच काय तर सोळशी धरणामुळे या भागातील शेती बागायती होण्याची शक्यता आहे. फक्त शेतीच नव्हे तर पिण्याच्या पाण्याची कमतरता, पशुधनासाठी पाण्याचा अभाव, यांसारख्या अडचणीही दूर होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, मुंबईशेजारील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर मधील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमचा मिटवण्यासाठी रायगड जिल्ह्यात २ धरणे बांधण्यास सुद्धा राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यातील पहिले धरण पोशीर नदीवर बांधण्यात येणार आहे. तर दुसरे धरण शिलार नदीवर उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या दोन्ही धरण उभारणीस मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.

दुसरीकडे, पालघर जिल्ह्यात देहरजी नदीवर वसलेल्या देहरजी धरणाचे काम ८० % पूर्ण झालं आहे. देहरजी धरणाची लांबी २,४५० मीटर असून उंची: ७१.६० मीटर आहे. या धरणाची एकूण साठवण क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर आहे आणि वापरण्यायोग्य साठवणूक क्षमता ९३.२२ दशलक्ष घनमीटर आहे. त्यानुसार, साधारण प्रतिदिन 255 दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.