परिस्थिती पाहून ‘नाईट कर्फ्यू’चा निर्णय घ्या! मुख्यमंत्र्यांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (Coronavirus new strain) आढळला आहे. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी रात्रीपासून रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. सरकारने महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू केलीय. त्यानंतर आता वेळ पडल्यास मुंबई आणि अन्य महापालिका क्षेत्रांबाहेरही नाईट कर्फ्यू लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्य सचिवांची परवानगी घेऊन जिल्हाधिकारी संबंधित जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करु शकतील. दरम्यान, आजपासून 27 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यू सुरु होणार आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात खबरदारी, नाईट कर्फ्यू लागू
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (21 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात आज 22 डिसेंबर 2020 पासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

हॉटेल व्यावसायिकांचाही विरोध
राज्य सरकारने 5 जानेवारीपर्यंत रात्रीच्या संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केलीय. हॉटेल सुरु ठेवण्यासाठी 11 ची वेळ दीड वाजेपर्यंत वाढवून द्यावी,अशी मागणी करण्यात आलीय. आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर हा व्यवसायाचा काळ असतो. या काळातच हॉटेल सुरु ठेवण्यास कमी वेळ मिळाला तर मोठे नुकसान होईल, असं शेट्टी यांनी सांगितले.

ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द
ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर वाढल्याने ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा तूर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत ही विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यूरोपीयन देशांनीही या आधीच ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवेला बंदी घातली होती. भारत सरकारने ब्रिटनमधून येणारी विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद केल्या आहेत. काल रात्री 12 वाजल्यापासून ही सेवा बंद होणार आहे.

एकही प्रवासी थेट घरी सोडणार नाही, सक्तीने क्वारंटाईन करणार, BMC आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये
ब्रिटन (UK) आणि आखाती देशांतून (Middle East countries) मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी केली जाईल. तसेच या प्रवाशांना 14 दिवसांसाठी हॉटेल्स आणि इतर ठिकाणी क्वारंटाईन होणे सक्तीचे असेल. तर इतर देशांतून येणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment