“आधी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे मग बोलावे”; अर्थमंत्र्यांची गांधींवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा अर्थसंकल्प निरर्थक असल्याचे म्हटले. त्याच्या टीकेला आता अर्थमंत्री सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “त्यांनी आधी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे आणि मग त्याबद्दल बोलावे,” असे सीतारामन यांनी म्हंटले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मी काल संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मत व्यक्त केले. “मला त्या लोकांची दया येते जे खूप लवकर प्रतिक्रिया देतात. तुम्हाला ट्विटरवर काहीतरी टिका करायची आहे म्हणून ते बोलतात. हे तुमच्या कामी येणार नाही. त्यांनी आधी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे आणि मग त्याबद्दल बोलावे,” असा टोला सीतारामन यांनी लगावला.

यावेळी सीतारामन पुढे म्हणाल्या की, देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या नेत्याने गृहपाठ न करता अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे. त्यांनी प्रथम त्यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांची काळजी घ्यावी. केंद्राने ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या त्यांनी राबवाव्यात. त्यांनी पंजाब, महाराष्ट्र आणि छत्तीसगडकडे लक्ष द्यावे.

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, सरकारने देशातील मध्यमवर्गीयांना दिलासा न देऊन विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षात पुन्हा टीकाटिपण्णी सुरु झाली आहे.

Leave a Comment