संस्था या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर मोठ्या होतात : ॲड. उदयसिंह पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तांबवे | संस्था या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर मोठ्या होत असतात. सभासद, ठेवीदार हा संस्थेतील कर्मचारी देत असलेल्या सेवाभावामुळे येत असतो. छ. शाहू पंतसंस्था कर्मचाऱ्यांनी केलेली सेवा यामुळे आज प्रगतीपथावर आहे. कोणतीही संस्था यशस्वी होण्यासाठी निगडीत प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे, असे प्रतिपादन रयत कारखान्यांचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील यांनी केले.

तांबवे (ता. कराड) येथील छ. शाहू पंतसंस्थेचे सचिव सुरेश जग्गनाथ पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच शोभाताई शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य व रयत कारखान्याचे संचालक प्रदीप पाटील, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, पंतसंस्थेचे चेअरमन जालिंदर पाटील, व्हा. चेअरमन लक्ष्मण देसाई, प्रा. धनाजी काटकर, हिम्मत थोरात, हणमंतराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्या विजयाताई पाटील, आनंदराव ताटे, सतिश पाटील यांच्यासह पंतसंस्थेचे संचालक व तांबवे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरेश पाटील म्हणाले, छ. शाहू पतसंस्थेच्या जडणघडणीत अनेकांनी हातभार लावला. या संस्थेच्या कार्यात मला सेवा करण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी, व्यापारी यांच्यासह अडचणीत सापडलेल्यांना मदत करण्याची संधी मिळाली. या संस्थेचे आणि संस्थेतील प्रत्येकाचे मी मनः पूर्वक आभार मानतो.  प्रास्ताविक लक्ष्मण देसाई यांनी केले. शंकर माने यांनी आभार मानले.