हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन।ए.आर.रेहमान हे प्रसिद्ध संगीतकार आहेत. आतापर्यंत ए.आर.रेहमान यांनी अनेक गाण्यांना संगीतबद्ध केलं आहे. त्यांना आजवर अनेक मोठे पुरस्कारही मिळाले आहेत. येवढंच नव्हे तर त्यांनी ऑस्कर पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं आहे. परंतु सध्या ऑए.आर.रेहमान चर्चेत आले आहेत. आपल्या विरोधात एक गट अफवा पसरवत आहे, असा आरोप रेहमान यांनी केला आहे. तसंच आपल्याविरोधात अशा उडवल्या जाणाऱ्या अफवांमुळे चित्रपटसृष्टीत कोणीही आपल्याला काम देत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. नुकताच ए.आर.रेहमान यांनी संगीत दिग्दर्शन केलेला दिल बेचारा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
हल्ली तुम्ही कमी चित्रपटांमध्ये संगीत दिग्दर्शन का करता असा सवाल रेहमान यांना मुलाखतीदरम्यान करण्यात आला होता. यावर त्यांनी खळबळजनक उत्तर दिलं. “मी चांगले चित्रपट कधीच नाकारत नाही. परंतु असा एक गट आहे जो काही गैरसमजांमुळे माझ्याविरोधात अफवा पसरवत आहे. मुकेश छाब्रा हे माझ्याकडे आले होते आणि मी दोन दिवसांमध्ये त्यांना गाणी तयार करून दिली,” असं ते म्हणाले.
“छाब्रा यांनी मला सांगितलं की अनेकांनी त्यांना माझ्याकडे जाऊ नका असं म्हटलं. तसंच माझ्याविरोधातही त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या,” असंही रेहमान यांनी यावर बोलताना सांगितलं.” त्यांच्या गोष्टी ऐकून मला समजलं की मला सध्या काम का मिळत नाहीये आणि चांगले चित्रपट माझ्याकडे का येत नाहीयेत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. चित्रपटसृष्टीत काही लोक असेही आहेत, ज्यांना वाटतं की मी त्यांच्यासोबत काम करावं आणि अशीही काही लोकं आहेत ज्यांना वाटतं की मला काम मिळू नये. मी नशीबावर विश्वास ठेवतो असेही ते म्हणाले.