मृत्यूनंतरही दैनावस्था ! अंत्यसंस्काराला जाण्यासाठी 4 फूट पाण्यातून वाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. नदीकाठच्या गावांना याचा मोठा फटका बसताना दिसतो. काही गावांना तर पावसाळ्याचे चार महिने कधी एकदा सरतील असे होते. औरंगाबादच्या खुलताबाद येथील ताजनापूर भागातील परिस्थिती समोर आली आहे. इथल्या गावातील नागरिकांना दर पावसाळ्यात अंत्यसंस्काराला जाण्यासाठी चार फूट खोल नदीत उतरून जावे लागते. गाव तसे लहानच असले तरीही अशा अंत्ययात्रेसाठी शेकडो लोक पाण्यात उतरून कब्रस्तानात जातात.

पावसाळा आला की ताजनापूरची अवस्था बिकट होते. ताजनापूर गावची लोकसंख्या तीन हजारांपेक्षा जास्त आहे. इथे बहुसंख्य मुस्लीम घरे आहेत. मात्र मुस्लीम समाजाचे कब्रस्थान नदीच्या पलीकडे आहे. गावातील प्रमुख रस्त्यापासून कब्रस्थानपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची अंत्ययात्रा नदीपात्रातून नेली जाते. एवढा खडतर प्रवास केल्यानंतर कब्रस्थानात पुढील विधी करता येतात. गावातील एखाद्या व्यक्तीचा पावसाळ्यात मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यसंस्काराची वाट मोठी कठीण होते.

मंगळवारीदेखील असाच प्रसंग समोर आला. गावात एका व्यक्तीचे निधन झाले. बुधवारी त्यांचे पार्थिव कब्रस्थानमध्ये नेण्यासाठी नागरिकांना नदीपात्रातून जावे लागले. दोन-तीन दिवस सलग पाऊस सुरु असल्यामुळे नदी पात्रात भरपूर पाणी होते. त्यामुळे चार फूट खोल पाण्यातून प्रवास करत नागरिकांनी पुढील क्रियाकर्म केले. ग्रामस्थांचे हे हाल पाहून प्रशासनाने आता तरी इथपर्यंत रस्ता बांधून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

 

Leave a Comment