महाराष्ट्रात पक्ष फोडून सरकार पाडायला पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच राजाश्रय, पृथ्वीराज चव्हाणांचा थेट हल्लाबोल

0
1
prithviraj chavan narendra modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : महाराष्ट्रातील सरकार पाडायला आणि पक्ष फोडायला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) स्पष्ट आशिर्वाद होता. मोदींच्या संमतीनेच सगळं झालेलं आहे. त्यांनी लॉजिस्टिकल मदत पुरवली असल्याचा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. तसेच हा राजनैतिक भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सरकार पाडण्यात राजनैतिक भ्रष्टाचार

भ्रष्टाचार हा दोन प्रकारचा आहे. एक अर्थिक भ्रष्टाचार जो निवडणूक रोख्याच्या माध्यमातून पुढे आला आहे. पैसे दिले की नंतर कंत्राट मिळते, सीबीआय, ईडींची छापेमारी झाली की चार आठ दिवसात पैसे जमा होतात आणि नंतर छापे बंद होतात. दुसरा भ्रष्टाचार हा वैचारिक, राजनैतिक आहे. जो सरकार पाडण्यामध्ये झाला आहे. अशा राजनैतिक भ्रष्टाचारामुळे यापुढे कुठलंच निवडून आलेलं सरकार टिकू शकणार नाही, अशी भीती पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

अर्थव्यवस्थेचं संचालन करण्यात अपयश

पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्थव्यवस्थेचं संचालन करण्यात अपयश आलेलं आहे. त्यामुळे महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मोदी सरकारला शेती विधेयके मागे घ्यावी लागली. शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन करून नरेंद्र मोदींना माघार घ्यावी लावली. त्यामुळे सरकारने धोरणात कांदा, गहू, भात, साखरेवर निर्यातबंदी आणली. दर वाढायला लागले की बाहेरून माल आयात करायचा आणि दर पाडायचे. हे कशाकरिता चाललंय? अशा धोरणामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आला असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

संविधान बचाव हा निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा

देशाचे संविधान हा निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. संविधान बचाव हे फक्त आंबेडकरी जनतेपुरतं नाही. संविधानामुळे बहुजन समाजालाही फायदा मिळालेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी आमची काय परिस्थिती होती? त्यामुळे संविधान आम्ही बिलकुल जाऊ देणार नाही. भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, संविधान, निर्यातबंदी या पाच मुद्यांवर निवडणुकीतील लढाई असून हे राष्ट्रीय मुद्दे आहेत. मोदींनी याची उत्तरे दिली पाहिजेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

मोदींकडून ध्रुवीकरणाचा प्रचार

मोदी आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात काहीच बोललेले नाहीत. मंगळसूत्र, दागिन्यांचं ऑडीट होईल, असा त्यांचा ध्रुवीकरणाचा प्रचार चालला आहे. पंतप्रधान असं बोलतात, याची आम्हाला लाज वाटते, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण मोदींवर टीकास्त्र सोडलं. मोदींना ‘चारसो पार’चा आत्मविश्वास असेल तर सॅम पित्रोदांचे मुद्दे उचलायचं कारण काय? त्यामुळे सत्ताधाऱ्यांची कुठे तरी चलबिचल झालेली आहे किंवा काँग्रेसचं सरकार येईल, असं त्यांना वाटतं असावं, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न लोक हाणून पाडतील

जातीय ध्रुवीकरणामुळे काँग्रेसचा पराभव होईल, असं समजलं तर विरोधक कोणत्याही निवडणुकीत जातीय ध्रुवीकरण करतील आणि निवडून येतील. परंतु, तसे होणार नाही. लोक तो प्रयत्न हाणून पाडतील, हा आम्हाला विश्वास असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

यंदाची निवडणूक १९७७ च्या निवडणुकीसारखी

यंदाची निवडणूक मला आणीबाणीनंतरच्या १९७७ मधील निवडणुकीसारखी वाटतेय, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. आणीबाणीमुळे इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण होतं. त्या आणीबाणी मागे घेणार नाहीत आणि हुकूमशहा राहतील. लोकशाही वाचवायची असेल तर इंदिरा गांधींचा पराभव केला पाहिजे, असं वातावरण झालं होत. त्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि आमचं सरकारही गेल. तशा प्रकारचं वातावरण मला यावेळी दिसतंय. मोदींच्या विरोधातील वातावरण मतांमध्ये परावर्तीत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

मत विभागणी टाळण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना

सत्ताधाऱ्यांविरोधातील मतांची विभागणी होऊ नये, हा इंडिया आघाडी निर्माण करण्यामागचा उद्देश होता. आमची मते विभागली गेली नाहीत तर नक्की इंडिया आघाडीला बहुमत मिळेल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच यापूर्वी मोदींच्या विरोधात ६० ते ७० टक्के लोकांनी मतदान केलेलं आहे. ते जर एकवटलं तर मोदींचा पराभव होऊ शकतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

उज्ज्वल निकम यांचा उमेदवारी घेण्यास नकार

भाजपने ॲड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्याबद्दलच्या प्रश्नावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आम्हीही त्यांना उमेदवारीबद्दल विचारणार कैली होती. पण, त्यांनी नकार दिला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला २८ पेक्षा जास्त जागा मिळतील आणि भाजपाचं मोठं नुकसान होईल. तसेच अमरावतीत आम्ही नक्की जिंकू, असा ठाम विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.