हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Privatization of ST । मागील काही वर्षापासून राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसचे खासगीकरण होणार अश्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळाल होते. एसटीचे खासगीकरण झाल्यास संभाव्य फायदा- तोट्यावर सुद्धा अनेकदा चर्चा झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र आता खुद्द राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनीच याबाबतच स्पष्ट माहिती देत लोकांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे. कोणत्याही परिस्थितीत एसटीचे खासगीकरण होऊ देणार नाही असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.
MSRTC ही एक स्वायत्त संस्था- Privatization of ST
मुंबईतील परळ बसस्थानकामध्ये कामगार नेते भाई जगताप यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांच्या पुढाकाराने कर्मचारी व प्रवाशांसाठी जलशीतकाचे लोकार्पण करताना प्रताप सरनाईक म्हणाले, सुमारे ८३,००० लोकांना रोजगार देणारी राज्य परिवहन संस्था ही सार्वजनिक संस्था राहील. “MSRTC ही एक स्वायत्त संस्था आहे. अशावेळी खाजगीकरणाचा (Privatization of ST) प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केलं.
ते पुढे म्हणाले, एसटीचा कर्मचारी अत्यंत मेहनती आहे. तो काम करीत असलेल्या ठिकाणी त्याला मूलभूत सोयी – सुविधा पुरविणे ही एसटी प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ शौचालये, योग्य विश्रांतीची जागा आणि अगदी ताजे धुतलेले गणवेश आणि केस कापणे आणि दाढी करणे यासारख्या सौंदर्यप्रसाधनांच्या सेवा देखील लवकरच उपलब्ध होतील. यासाठी लवकरच एका खाजगी एजन्सी नेमण्यात येईल. त्यांच्याकडून विश्रांती गृहाच्या स्वच्छतेबरोबर कर्मचाऱ्यांचे गणवेश स्वच्छ धुऊन इस्त्री करून कर्मचाऱ्यांना देण्याबाबत व्यवस्था करण्यात येणार आहे, शेवटी चांगले वातावरण म्हणजे चांगले काम असं म्हणत एसटी कर्मचाऱ्यांचे कल्याण वाढवल्याने, कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजांकडे अशा प्रकारे लक्ष दिल्यास एमएसआरटीसीची कार्यक्षमता आणि उत्पादन सुधारेल अशी अपेक्षाही प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.




