झेंडा बदलण्यापेक्षा मन बदला; रामदास आठवलेंचा मनसेला सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : झेंडा बदलल्याने काहीही फरक पडणार नाही, मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी मनसेला दिला आहे. रामदास आठवले नगर दौऱ्यावर आहेत. त्यावेळेस पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा सल्ला दिला. मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असं आठवले म्हणाले. भाजपने मनसेबरोबर युती न करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफी दिली आहे. ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळावा, अशी मागणीही आठवले यांनी केली. आम्ही भाजपबरोबर आहोत, पण राज्यातलं तीन पक्षाचं सरकार किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असून आता सरकारमध्ये किती काळ राह्यचं हे या तिन्ही पक्षांनाच ठरवावं लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Leave a Comment