‘इन आँखों की मस्ती’ को आज भी ‘इजाजत’ हैं – ‘खुबसूरत’ रेखा से ‘इश्क’ करने की

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । समीर गायकवाड

भानुरेखा गणेशन – नाव जरा अनोळखी वाटलं तरी आपलंच आहे बरं का. हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या सौंदर्याने सदाबहार ठेवणाऱ्या रेखाचं हे नाव. रेखाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. वयाच्या १२ व्या वर्षी बालकलाकार म्हणून तिने तेलगू चित्रपट रंगुला रत्नम म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘सावन भादो’ या चित्रपटातून तिने आपल्या मुख्य कारकिर्दीला सुरुवात केली. रेखाने आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. रेखाला आतापर्यंत ३ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील २ पुरस्कार हे खूबसूरत आणि खून भारी मांग या चित्रपटांतील सर्वोत्कृष्ट नायिकेच्या अभिनयासाठी तर १ पुरस्कार हा १९९६ साली खिलाडीयों के खिलाडी या चित्रपटातील सहायक अभिनेत्रींच्या भूमिकेसाठी मिळाला आहे.

उमराव जानमधील अभिनयासाठी रेखाला उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दलही बऱ्याच चर्चा रंगलेल्या होत्या. २०१० साली पदमश्री पुरस्काराने रेखाला गौरवण्यात आलं. करारी बाणा, चेहऱ्यावरील नजाकती, उत्तम नृत्यकौशल्य, थेट संवादफेक या रेखाच्या अभिनयकौशल्यातील खास लक्षात राहणाऱ्या गोष्टी आहेत. आजही रेखा पूर्वीइतकीच सदाबहार वाटते. रेखाला कुणीही एकेरी उल्लेखात बोलावू शकतो ही तिच्या मोकळेपणाची आणि रसिकांच्या मनावर गारुड करण्याची ताकद आहे. रेखाला तिच्या दीर्घायुष्यासाठी हॅलो महाराष्ट्र परिवाराकडून मनःपूर्वक सदिच्छा..!!

रेखा आणि नसिरुद्दीन शाह यांच्या ‘इजाजत’ चित्रपटातील आठवणींचा किस्सा

बाहेर रोमँटिक पाऊस पडतोय आणि मी जाऊन पोहोचलोय त्या रेल्वे स्टेशनवर जिथे कधी काळी रेखा आणि नसिरुद्दीन त्या गदगदून आलेल्या, घनगर्द असलेल्या स्टेशनवर एक रात्र घालवण्यासाठी अकस्मात एकत्र येऊन थांबले आहेत. एकमेकाला पाहून त्यांच्या मनात अनेक भावना दाटून आल्यात. मागच्या जखमा ताज्या झाल्यात अन काही जुन्या खपल्या देखील निघाल्यात. त्याच्या जीवनात आलेल्या ‘दुसरी’ची आता काय अवस्था आहे हे तिला जाणायचेय अन आपण कसे वाहवत गेलो, आपली चूक नव्हती हे त्याला सांगायचेय. रात्रभर तो तिच्याकडे बघत बोलत राहतो, मात्र ती अधून मधून नजर चुकवत राहते. त्याला खरे तर माफी मागायचीय पण एकाच दमात सारं सांगण्याची त्याची हिंमत होत नाहीये. तिलाही आठवत्येय की सुरुवातीला आपण किती सुखी होतो मात्र त्याने आपल्याशी प्रतारणा करावी याचा धक्का कसा पचवावा हे तिला उलगडलेले नाही.

रात्रभर तळमळत असणारा अंधार तिच्या अंगावरच्या शालीत तिला अलगद लपेटून चिंब झालाय अन मंद पिवळसर उजेड त्याच्या ओलेत्या डोळ्यात झिरपतोय, निर्मनुष्य स्थानकावरच्या प्रतिक्षागृहाच्या खडबडीत दगडी भिंती त्या दोघांना रात्रभर ऐकून सुन्न होऊन गेल्या आहेत, ते ज्या टेबलभोवती बसले होते तिथल्या खुर्च्या त्यांना जवळ आणण्यासाठी आसुसल्या आहेत तर पहाटेच्या गारव्याला त्यांना जवळ आणायचे आहे. मात्र ज्या बाकावर ते दोघे बसून आहेत त्याला मात्र त्यांचा अबोला भावतो आहे. स्थितप्रज्ञ होऊन त्या दोघांना तो आपल्या कवेत घेऊन बसला आहे. तिथल्या हेडलॅम्पला त्या दोघांना डोळे भरून पाहायचेय तर प्लॅटफॉर्मवरील लांबसडक कॉरिडॉरला त्यांचे खाली पडणारे अश्रू झेलायचे आहेत. तो हळूहळू गुलाबाची एकेक पाकळी अल्वारपणे बाजूला काढावी तशा एकेक घटना तरलपणे तिच्या पुढ्यात मांडतोय, त्याचं दुखणं ऐकता ऐकता तीआतूनच धुमसून निघत्येय, आपण कुठे कमी पडलो याचा तिचा शोध संपत नाहीये अन रातकिड्यांची किर्रर्र देखील सरत नाहीये.

तिला जाणून घ्याययचेय ती घरात नसताना ‘त्या’ रात्री घरात नेमके काय झाले होते ? तो तसं का वागला होता ? त्यालाही सत्य सांगायचेय, मात्र सत्य सांगताना त्याला तिचं मन पाकळीवरच्या दवबिंदूसारखं जपायचं आहे. तो जीवापाड प्रयत्न करतोय, त्याच्या चेहऱयाकडे बंद खोलीची काचेची पिवळसर तावदाने डोळ्यात पाणी आणून पाहतायत अन दरवाजा भिंतीत तोंड खुपसून मूक अश्रू ढाळतोय !! ती अधून मधून नाकावरचा चष्मा मागे सरकावण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे बघत्येय, त्याच्यात काय बदल झालेत याचा हळूच अंदाज घेतेय तर तो तिच्याकडे तिरक्या नजरेने डोळे भरून पाहत ती किती बदलली आहे याचे गणित करतोय. आता पहाट सरत आलीय, आपल्या मनातलं मळभ त्यानं रितं केलंय. झालं गेलं विसरून जा अन माझ्याकडे परत ये इतकंच सांगायचे बाकी राहिल्येय असं सांगायचाच अवधी आहे. दरम्यान रात्रभर झोपी गेलेल्या सभोवतालच्या झाडाच्या पालवीला आत जाग आलीय अन वाऱ्याचा रात्रीचा सूर देखील बदललाय. तो मनाचा हिय्या करून तिच्याशी आता बोलणारच आहे इतक्यात तांबड्या पिवळ्या सुर्यकिरणांना घेऊन “तोही ‘ येतो !

हा ‘तो’ म्हणजे तिचा सध्याचा पती !! त्याच्याकडे नजर जाताच ह्याचे शब्द गळ्यात विरतात, अश्रू डोळ्यात विझून जातात. तो स्तब्ध होऊन जागीच् थिजून जातो. रात्रभर दोलायमान झालेलं तिचं मन ‘त्याला’ पाहून किंचित खुलून उठतं. तिचं हसू खरं की खोटं याचा अंदाज बांधत हा रडवेला होऊन जातो. त्या दोघांना रात्रभर अनुभवणारे ते प्लॅटफॉर्म, ती खोली,त्या खिडक्या, तो दरवाजा, टांगता हेडलॅम्प., तांबडे पिवळे दिवे, तो बाक, ते टेबल, त्या खुर्च्या साऱ्यांना नियतीने चकवा दिलाय. सारेच हिरमुसले आहेत.

मी देखील चेहरा बारीक करून तिथून निघालो आहे. पाऊस पूर्ण थांबला आहे. प्रसन्न सकाळ झालीय अन आकाश निरभ्र झालेय. उंच आकाशात उडणाऱ्या बगळ्यांच्या त्रिकोणी थव्यात मी व्हिक्टरीचे ‘व्ही’ शोधत शीळ घालत निघतोय. जीवन असेच आहे एका हातात काही तरी आलेय म्हणेपर्यन्त दुसऱया हातातले काही तरी गळून पडलेले असते. साऱ्यांना सारे मिळत नसते, जो क्षण समोर आहे त्याला स्वच्छंदीपणे समोर जाताना जीवनाशी व स्वतःशी प्रामाणिक राहिले की दुःखाचा आनंदही सुखाइतकाच घेता येतो.

काळजात घर करून राहिलेल्या सिनेमांत ‘इजाजत’चे स्थान फार वरचे आहे….. ‘इजाजत’ केवळ एक सिनेमा नाही तर जीवनातील नात्यांचा हळुवार उलगडा करून दाखवणारी हळवी कविता आहे ..मनात खोल खोल रुतून बसणारी अन उत्तुंग अभिनयाने सजलेली, नटमोगरी नसली तरीही सोज्वळ चाफ्यासारखी दरवळणारी प्रेमपुष्पांची नाजूक गाथा आहे.

मी जेंव्हा जेंव्हा ‘इजाजत’ पाहतो, तेंव्हा नात्यांचे अर्थ नव्याने शिकतो. जीवनातील सुखदुःखाच्या व्याख्या नित्य नव्याने सांगणारया रुपेरी पडद्यास नम आँखोसे सलाम..!!

समीर गायकवाड हे सोलापूरस्थित मुक्त पत्रकार असून चित्रपट, संगीत, ग्रामीण जीवन, राजकारण, रेड लाईट एरियामधील जीवन, शायरी या विषयांवर ते विपुल लेखन करतात.

Leave a Comment