हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटची आन बाण आणि शान हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) नुकतीच कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. मागच्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्यामुळे रोहित आता फक्त एकदिवसीय सामन्यातच (One Day Cricket) भारतीय क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. रोहितने जास्तीत जास्त काळ वनडे क्रिकेट खेळावं आणि २०२७ च्या विश्वचषकात संघाचे नेतृत्व करावं अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र याच दरम्यान, रोहितने आपल्या वनडे निवृत्तीबाबत सुद्धा मोठा दावा केला आहे. ज्या दिवशी मला वाटेल कि मला जे करायचं आहे ते मी करू शकत नाही त्या दिवशी मी खेळणं थांबवेन असं रोहितने म्हंटल आहे.
सध्या तरी वनडे मधून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही- Rohit Sharma
पत्रकार विमल कुमार यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना रोहित म्हणाला, ज्या दिवशी मला वाटेल की मी मैदानावर जे करायचे आहे ते करू शकत नाही, तेव्हा मी खेळणे थांबवेन… जेव्हा मला वाटेल कि माझ्या बॅटिंग मुळे संघाला फायदा होणार नाही, त्या दिवशी मी निवृत्ती घेईन हे निश्चित आहे. पण सध्या, मला माहित आहे की मी जे करत आहे ते संघाला फायदेशीर आहे. म्हणजेच काय तर सध्या तरी वनडे क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार रोहित शर्माच्या मनात नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना कुठे तरी दिलासा मिळाला आहे.
या मुलाखतीत रोहितने त्याच्या फलंदाजीतील बदललेल्या दृष्ठीकोनाबद्दल सुद्धा सांगितलं. रोहित म्हणाला, “मी ज्या पद्धतीने आधी खेळायचो, त्यावेळी मी माझा वेळ घ्यायचो… पूर्वी मी पहिल्या १० षटकांत ३० चेंडू खेळायचो आणि फक्त १० धावा करायचो. पण आता जर मी २० चेंडू खेळलो तर मी ३०, ३५ किंवा ४० धावा करण्याचा विचार करतो. पहिल्या १० षटकांत ८० धावा कशा करता येईल यावर माझा भर असतो. मी कधीही माझ्या वयक्तिक रेकॉर्ड कडे बघत नाही. मी फक्त माझ्या संघाच्या विजयात मी काय योगदान देऊ शकतो? संघाच्या विजयात काय महत्त्वाचे आहे याचा विचार करून फलंदाजी करतो असं रोहित शर्माने (Rohit Sharma) स्पष्ट केलं.