…तोपर्यंत सातारा ते पुणे महामार्गाची टोल वसुली बंद करा – शिवेंद्रसिंहराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । पावसामुळे सातारा – पुणे या राष्ट्रीय महामार्गाची खड्डे पडून चाळण झाली आहे. मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली असून वाहनचालक आणि प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. सातारा ते पुणे महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी आणि जोपर्यंत दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत टोल वसुली बंद करा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. शिवेंद्रसिंहराजे यांनी आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली आणि मागणीचे निवेदन त्यांना दिले. यावेळी राजू भोसले, ज्ञानदेव रांजणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

सातारा ते पुणे एन. एच. 4 या महामार्गाचे पावसामुळे नुकसान झाले असून ठिकठिकाणी छोटे मोठे खड्डे पडले आहेत. महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून चारचाकी वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याचे प्रसंग घडत आहेत. खड्ड्यात आदळून दुचाकी पडत आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होत असून वाहन चालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे.

प्रवाशी जायबंदी होणे अथवा प्राणाला मुकण्याची शक्यता आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्वरित महामार्गाची दुरुस्ती करावी आणि जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी सिंह यांनी दिले.

Leave a Comment