दिल्ली हिंसाचार: काँग्रेस नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, अमित शहांना पदावरून हटवण्याची केली मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचाराबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सादर करून आपला निषेध नोंदविला आहे. राष्ट्रपतींना निवेदन दिल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या , ”आम्ही नागरिकांचे जीवन, स्वातंत्र्य आणि संपत्ती सुरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे.” यासह दिल्लीतील हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्वरित पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणीही केली असल्याचं सोनिया यांनी सांगितलं.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग म्हणाले, ‘आम्ही राष्ट्रपतींना’ राजधर्मा’च्या रक्षणासाठी आपली शक्ती वापरण्याचे आवाहन केले आहे.  मनमोहन सिंग पुढे म्हणाले की, ”राष्ट्रपतींना भेटून गेल्या ४ दिवसांत दिल्लीत जे काय घडले यावर चिंता व्यक्त केली. तसेच या हिंसाचारात ३४ लोक मरण पावले आहेत आणि २०० लोक जखमी झाले आहेत ही लाजिरवाणी बाब आहे. केंद्रातील सरकार हिसाचारावर नियंत्रण ठेवण्यास कसे अपयशी ठरले आहे याबाबत राष्ट्रपतींना आम्ही अवगत केलं.”

ईशान्य दिल्लीत सलग तीन दिवस झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी २ जणांनी आपला जीव गमावला असून २ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात ३० आणि एलएनजीपी रुग्णालयात ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक जखमी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी बऱ्याच जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. झालेल्या हिंसाचारासाठी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तब्बल १८ एफआयआर नोंदविण्यात आले असून १३० दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे. काल बुधवारी कोणतीही मोठी हिंसाचाराची घटना घडली नाही. मात्र, रात्रीच्या वेळी मौजपूरसह काही भागात तुरळक हिंसाचाराच्या बातम्या समोर आल्या आहेत. दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान संवेदनशील भागात सातत्याने गस्त घालत आहे. ईशान्य दिल्लीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून, वातावरणात अजूनही तणाव आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दंगलीतील पीडितांना नुकसान भरपाई जाहीर केली. दिल्ली सरकारने पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी मदत योजना आखली आहे. दिल्ली सरकारच्या वतीनं मृतांच्या कटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई देण्यात येईल. तसेच गंभीर जखमींना २-२ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.तसेच दंगलीत ज्यांची आपली घरे जाळली गेली आहेत त्यांना ५ लाख रुपये दिले जातील. याचसोबत दिव्यांग झालेल्या लोकांना सुद्धा समान रक्कम देण्याची घोषणा केली आहे.दिल्ली हिंसाचारात मृत्य पावलेल्या अल्पवयीन मुलांच्या कुटुंबियांना सुद्धा ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितलं.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment