मुंबई | मुंबईला प्राणवायू देणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे देशातीलच नव्हे तर जगातील एक आदर्श राष्ट्रीय उद्यान व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यात सर्वांचे योगदान अपेक्षित असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आयोजित कार्यक्रमात वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वनमंत्र्यांनी अभिनेत्री रविना टंडन यांची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उद्यान राजदूत म्हणून अधिकृत घोषणा केली. त्यांनी श्रीमती टंडन यांना उद्यान राजदूत पदाचा सॅश तसेच पर्यावरणस्नेही पद्धतीने करण्यात आलेल्या ३ डी प्रिंटेड बिबट्याची प्रतिकृती प्रदान केली.
कार्यक्रमास खासदार गोपाळ शेट्टी,आमदार सर्वश्री मनिषा चौधरी,प्रकाश सुर्वे, प्रविण दरेकर, सरदार तारासिंग, वन विभागाचे सचिव विकास खारगे, अनेक स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी, उद्यानाला ई बग्गी भेट देणारे महेंद्र मोरे, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष धर्मेंद्र जोरे आणि त्यांचे सहकारी, उद्यानातील आदिवासी पाड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविना टंडन यांनी धन को नही वन को महत्व दिया असं सांगत श्री. मुनगंटीवार म्हणाले की, श्रीमती टंडन या उद्यान राजदूत झाल्याने उद्यानाच्या विकासाला निश्चितपणे गती मिळेल. आज रविना टंडन यांनी एक बिबट दत्तक घेतले आहे. त्यांच्या पुढाकारातून या कामास आणखी गती मिळेल. त्या स्वत: उत्कृष्ट वन्यजीव छायाचित्रकार आहेत. त्यांनी स्वत: काढलेली छायाचित्रे रुद फाऊंडेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. यातून येणारा निधी त्या उद्यानाच्या विकासासाठी, वन्यजीव संवर्धनासाठी वापरणार आहेत. सामाजिक दायित्व निधी मिळवण्यासाठी त्या प्रयत्नशील असून यातूनच त्यांनी उद्यानाला ई बग्गी उपलब्ध करून दिली आहे.
जगाच्या पाठीवर राष्ट्रीय उद्याने किंवा वने खूप आहेत परंतु मुंबईसारख्या महानगरात, दाटीवाटीच्या लोकसंख्येत वसलेले हे १०३ चौ.कि.मी चे जंगल खूप वेगळे आहे,असे कुठही आढळत नाही. हे मुंबईला आरोग्यसंपन्न प्राणवायू देणारे, मुंबईचे हे फुफ्फुस आहे. देशात सर्वाधिक आयकर जमा करणारे शहर मुंबई आहे. या शहरातील १२ टक्के नागरिकांना या उद्यानातील जलाशयाचे पाणी पिण्यासाठी मिळते. अशा या उद्यानाची जपणूक करण्यासाठी, पर्यावरण आणि वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.