हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येने महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या प्रकरणानंतर अखेर 84 दिवसांनी धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. या सर्व घडामोडींमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आज सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मुंडे यांनी तब्येतीचे कारण दिले, मग सरकार नैतिकतेचा मुद्दा कसा करत आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणातील धक्कादायक फोटो आणि चार्जशीट सरकारकडे असतानाही 84 दिवस राजीनामा का घेतला नाही, असा प्रश्नही सुळे यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, कृष्णा आंधळे हा अचानक गायब कसा झाला, याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासह हत्येप्रकरणात संशयित वाल्मिक कराड याने धनंजय मुंडेंना थेट फोन केला होता, असा दावा करत दोघांमधील संबंधांवर सुप्रिया सुळे यांनी संशय व्यक्त केला. त्याचबरोबर, “मला सरकारला विचारायचं आहे तुम्ही म्हणताय नैतिकता म्हणून राजीनामा दिलाय. मात्र ज्याने राजीनामा दिलाय तो म्हणतोय तब्यतीमुळे दिला सुरेश धस म्हणतात ते बरोबर आहे… धनंजय मुडे आणि नैतिकता यांची कधी भेट झाली नाही” अशी टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आठ आरोपींची नावे चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आली आहेत. व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. आता उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या अमानुष हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.