औरंगाबादेत सूर्य ओकतोय आग; दोन वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – सूर्य एप्रिलअखेरीस अक्षरश: आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. शहरात बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील आणि गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी 42.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली. वाढत्या तापमानाने औरंगाबादकरांच्या जिवाची काहिली होत आहे.

ढगाळ वातावरणामुळे शहरातील तापमान गेल्या आठवड्यात घसरले होते. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची काहीशी सुटका झाली होती. शहरात रविवारी 37.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. दुसऱ्याच दिवशी 25 एप्रिलला तापमानात 3.2 अंशांनी वाढ झाली आणि 40.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्यानंतर आता अवघ्या दोन दिवसांत तापमानाचा पारा 42 अंशांवर गेला आहे.

शहरात सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत असून, दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाच्या झळामुळे दुपारी 12 वाजल्यानंतर शहरातील बहुतांश रस्त्यावर तुरळक वर्दळ पाहायला मिळत आहे. सकाळी 11 ते 4 वाजण्याच्या दरम्यान चटके तीव्रतेने जाणवत आहेत. त्यामुळे नागरिक या वेळेत बाहेर पडण्याचे टाळत आहेत. ऊन कमी झाले तरी सायंकाळनंतर वातावरणातील उकाडा कायम राहतो आहे.

Leave a Comment