शेतकऱ्याने स्वतः चा 3 एकर ऊस पेटवला : सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यात राज्य सरकारचा अनोख्या पध्दतीने निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्यातील साखर कारखाने अद्यापही सुरू आहेत. ऊस तोडीचे योग्य नियोजन न झाल्याचा तोटा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील एका शेतकऱ्यांने आपला तीन एकर ऊस पेटवला आहे. राज्यकर्त्यांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर ही वेळ आली असल्याचे त्या शेतकऱ्याने खंत व्यक्त केली. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या जिल्ह्यातच योग्य वेळेत ऊसतोड येत नसल्याने ऊस पेटविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे यांनी स्वतःचा तीन एकरातील ऊस पेटवून दिला. राज्यकर्त्यांमुळे ऊस पेटवून देण्याची वेळ आली असल्याचा आरोप करत दोन्ही साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी ऊस तोडण्यासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांनी ऊसाला पालापाचोळा जास्त असल्याचे कारण देत ऊस तोडण्यासाठी नकार दिल्याने त्यांना शाल श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचाही त्यांनी सत्कार केला.

गेली 20 महिने ऊसाचे पीक शेतात उभे आहे. अद्याप गाळप न झाल्याने ऊसाच्या वजनात मोठी घट झाली आहे. ऊस तोडीचे योग्य नियोजन नसल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. दरम्यान बर्गे यांनी राज्य सरकारचा निषेध करत तीन एकर क्षेत्रातील ऊस पेटवून दिला.

Leave a Comment