सणासुदीच्या काळात नागरिकांना महागाईचा फटका; तूर, हरभरा, मसूर डाळींच्या किमती वाढल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऐन सणासुदीच्या काळात वाढलेल्या महागाईने नागरिकांना हैराण केले आहे. पेट्रोल डिझेलनंतर आता रोजच्या वापरातील कडधान्य, डाळीच्या किमती देखील वाढल्या आहेत. तूर, हरभरा, मसूर अशा डाळींसोबत मैदा, रवा, साखर, तांदूळ, मसाल्याचे पदार्थ, जिरे, मोहरीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अशा महागाईच्या काळात लोकांनी सण कसा साजरी करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महागाईमुळे १३४ रुपये असलेली तूर डाळ आता १५२ रुपये किलोवरून १७० रुपयांवर जाऊ शकते. तर हरभरा डाळीच्या किमतीत देखील वाढ होऊ शकते. या वाढलेल्या किमतीमुळे नागरिकांच्या खिश्याला कात्री बसणार आहे. मुख्य म्हणजे, येत्या काळात तांदळाचे भाव देखील वाढू शकतात. सध्या बाजारात हिरव्या भाज्या, फळांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यानंतर आता डाळीच्या किमती देखील वाढ होणार असल्याचे समोर येत आहे.

राज्यात सण समारंभ आल्यामुळे पोळ्या करण्यासाठी हरभऱ्याच्या डाळीची जास्त मागणी होत आहे. मात्र मागणी जास्त आणि साठा कमी झाल्यामुळे हरभरा डाळींच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. राज्यात मध्यंतरी झालेल्या पावसाचा परिणाम पिकांवर झाला आहे. त्यामुळे उत्पादनाचे संपूर्ण गणितच बिघडून गेले आहे. यामुळेच एका बाजूला सण साजरी होत असताना दुसरीकडे महागाई वाढत आहे. बाजारात गहू, ज्वारीसह मैदा, कणिक आणि रव्याचे भाव वाढले आहेत.

डाळींच्या किमती

यासोबतच साखरेच्या किमतीत देखील दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे. या महागाईने जिर मोहरीला देखील सोडले नसून त्यांच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे गृहिणीचे खर्चाचे संपूर्ण गणितच बिघडून गेले आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात बाजारात तूरडाळ १५५ रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. हरभरा डाळ ८० रुपये प्रतिकिलो, मूग डाळ १४० रुपये प्रतिकिलो, उडीद डाळ १४० रुपये प्रतिकिलो, मसूर डाळ १४० रुपये प्रतिकिलो, साखर ४४ रुपये प्रतिकिलो विकली जात आहे.