शेततळ्यात बुडाल्याने बापलेकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड | गेवराई तालुक्यात बापलेकासोबत अजून एकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दिनांक 10 रोजी पाचच्या सुमारास घडली. गेवराई तालुक्यातील दैठण येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

सुनील जगन्नाथ पंडित ( वय 42) त्यांचा मुलगा राज पंडित (वय 12) आणि मयत सुनील पंडित यांच्या पत्नीचा भाचा आदित्य पाटील (वय 10 रा. शेवगाव) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. गेवराई येथे मृत सुनील पंडित यांचा चार चाकी वाहन खरेदी विक्री फायनान्स व्यवसाय होता. ते मागील काही वर्षांपासून शहरात वास्तव्यास होते. त्याचदरम्यान सुनील पंडित हे गुरुवारी दुपारी मुलगा राज आणि भाचा आदित्य या दोघांना घेऊन त्यांच्या पैठण येथील शेतात गेले होते. यानंतर ते शेतातील शेततळ्यावर गेले असता, राज आणि सुनील यांचा भाचा आदित्य पोहण्यासाठी शेत तळ्यात उतरले, ते दोघे पाण्यात बुडत असल्याचे पाहून सुनील पंडित यांनी त्या दोघांना वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. आणि दोघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न त्यांनी केले. परंतु शेततळ्याच्या अस्तरीकरणावरून पाय घसरत असल्याने त्यांना वरती येण्यासाठी सहारा न मिळाल्यामुळे तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण दैठण तालुक्यात शोककळा पसरली होती.

Leave a Comment