पक्षात परतण्यासाठी काँग्रेसने सचिन पायलट यांच्यासमोर ठेवली ‘ही’ अट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सचिन पायलट यांचे बंड मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसने मोडून काढल्यानंतर पक्षानं पुन्हा एकदा परत येण्याची त्यांना विनंती केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन पायलट व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. सुरजेवाला म्हणाले की, “आमचे युवा सहकारी सचिन पायलट यांची भूमिका आम्ही माध्यमांतून ऐकली आहे. त्यांना भाजपात जायचं नाही. जर त्यांची ही भूमिका असेल आणि त्यांना काँग्रेसमध्ये परत यायचं असेल, तर त्यांनी हरयाणातील भाजपा सरकारकडून केलं जाणारं आदरातिथ्य सोडून तातडीनं जयपूरला परतावं,” असं आवाहन काँग्रेसनं सचिन पायलट यांना केलं आहे.

सुरजेवाला म्हणाले कि, ”जर सचिन पायलट भाजपात जाऊ इच्छित नाही, तर मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारचं सुरक्षा चक्र तोडून बाहेर यावं. जर भाजपात जायचं नाही, तर हे दोन हॉटेल भाजपाचा अड्डा बनला आहे, तिथून मुक्त व्हावं. भाजपा नेत्यांसोबत चर्चा बंद करावी आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपल्या जयपूरमधील घरी परतावं. मार्ग चुकलेल्या प्रत्येक काँग्रेस आमदाराला माझा सल्ला आहे, कुटुंबातील सदस्याला येण्याापासून रोखायला नको. परत यावं व पक्षासमोर बाजू मांडावी,” असं आवाहनं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे.

काँग्रेसने पायलट यांना त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी संधी दिली होती
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत काही मतभेद असतील तर पक्षासमोर मांडावं. काँग्रेस पक्ष तुमच्या तक्रारी ऐकण्यासाठी तयार आहे. अनेक वेळा त्यांना पक्षानं परत येण्याची विनंती केली. सचिन पायलट व इतर आमदारांना अनेकवेळा निमंत्रण दिलं गेलं व बैठकीसाठी निमंत्रित केलं होतं. विशेष म्हणजे त्यांना असंही सांगण्यात आलं होतं, की काँग्रेसमध्ये बहुमत तुमच्या बाजूनं आहे, तर ते सिद्ध करण्यासही सांगितलं होतं. काँग्रेसची एक नव्हे तर दोन बैठका बोलावण्यात आल्या होत्या. त्यांनी यावं व त्यांच म्हणणं मांडावं यासाठी अनेक वेळा विनंती करण्यात आली होती,” अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली.

सोनिया व राहुल गांधी यांनी त्यांच्या परतीचे दरवाजे खुले ठेवले
मागील ५ दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांचे पक्षात परतीचे दरवाजे खुले ठेवले. काँग्रेस नेतृत्त्वानं एकापेक्षा अधिक वेळा संपर्क केला. त्याचबरोबर समिती सदस्यांनीही त्यांना विनंती केली होती. त्यांना त्यांची भूमिका मांडण्याची विनंती केली. तसेच काँग्रेसवर निष्ठा आहे, तर ज्या हॉटेलमध्ये आहात, तिथून बाहेर पडून, माध्यमांना सांगावं की आपली निष्ठा काँग्रेससोबत असल्याचं जाहीर करावं. मात्र, तसं काहीच न केल्यानं जड अंतकरणानं आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागली,” असं स्पष्टीकरण सुरजेवाला यांनी पायलट यांच्यावरील कारवाईबाबत दिलं. सचिन पायलट यांना पक्षानं त्यांच्या युवा काळात पक्षानं अनेक पदांवर संधी देत पुढे आणलं. खासदार, केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री आदी पदे देऊन १४ वर्षाच्या काळात त्यांना पुढे आणण्यात आलं. अशा पद्धतीनं कोणत्याही नेत्याला कोणत्याच पक्षानं पुढे नेलं नसेल असं सुरजेवाला यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment