सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक साताऱ्यात किल्ले अजिंक्यतारा येथे ‘स्वाभिमान दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. आज 12 जानेवारी रोजी त्यांचा 313 वा राज्याभिषेक दिन आणि 13 वा सातारा स्वाभिमान दिवस साजरा करण्यात आला. किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेवर राज सन्मानात हा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवप्रेमींनी पहिल्यांदा आकर्षक पालखीची फुलांनी सजावट करून आली होती.
सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी आहे. सण 1708 रोजी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कैदेतून सुटल्यानंतर शाहू महाराजांनी वसवलेली सातारा हे भारतातील एकमेव शहर आहे. हे शहर वसवल्यानंतर शाहू महाराज यांचा राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मदिनी मंचकारोहन तथा राज्याभिषेक झाला. शाहू महाराज छत्रपती झाले आणि सातारा राजधानी झाली. हिंदुस्तानच्या इतिहासात हिंदवी स्वराज्याचा सर्वाधिक राज्य विस्तार छत्रपती शाहू महाराजांच्या काळात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्यात छत्रपती शाहू महाराजांना यश आले.
छत्रपती शाहू राज्याभिषेक हा महाराष्ट्र आणि हिंदुस्तानासाठी अभिमानाचा तसेच साताऱ्याच्या स्वाभिमानाचा दिवस आहे. हाच सातारा स्वाभिमान दिवस म्हणून आज 12 जानेवारी रोजी किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेवर साजरा करण्यात आला. यंदाचे हे 13 वे वर्ष आहे. त्यामुळे सातारकर आणि इतिहासप्रेमी यांच्यामध्ये या दिवसाबद्दल अभिमानाची भावना आहे. यावेळी पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेऊन मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने किल्ले अजिंक्यतारा दुमदुमून गेला होता.