औरंगाबादमध्ये मालगाडीने १६ कामगारांना चिरडले, रेल्वे रुळावर झोपणं जीवावर बेतलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली आहे. मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर औरंगाबादहून गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी पायी निघाले होते. रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद आहे. बदनापूर ते करमाडच्या दरम्यान सटाणा शिवाराजवळ रात्र झाली म्हणून रेल्वे रुळावरच त्यांनी पथारी पसरली आणि झोपी गेले. मात्र, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. यात १६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

स्थानिकांनी सकाळीच रेल्वेच्या चालकाने मोठ्याने हॉर्न दिल्याचं सांगितलं. चालकाच्या हा प्रकार लक्षात आला असल्याने त्याने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत या दुर्घटनेत १६ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. घटनास्थळी मजुरांचे साहित्य आणि कपडे अस्ताव्यस्त स्थितीत पडले होते. स्थानिकांनाही हे दृश्य भल्या पहाटे पहावं लागल्याने त्यांच्यामध्ये भीती पसरली होती. यावेळी ४ जणांना शर्थीच्या प्रयत्नांनी वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

Leave a Comment