मुलबाळ होत नसल्याने कुत्रे पाळले; या कुत्र्याचे निधन झाल्याने दाम्पत्याची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – नालासोपारा परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पाळीव श्वानाच्या विरहात या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येमागे आणखी काही कारण आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत.

हि घटना नालासोपाऱ्यातील गणेशनगर परिसरात घडली आहे. या ठिकाणचे रहिवासी असणारे विजय कदम आणि पत्नी जयश्री कदम यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत विजय कदम हे मुंबईतील एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. तर जयश्री या गृहिणी होत्या. त्यांना कोणतेही आपत्य नव्हते. यामुळे त्यांनी घरात एक कुत्रा पाळला होता. पण काहीदिवसांपूर्वी कुत्र्याचे निधन झाले. कुत्र्याच्या निधनाने मृत दाम्पत्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला. हा विरह सहन न झाल्याने शेवटी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी या दाम्पत्याला कोरोना झाला होता. कोविड सेंटरमध्ये काही दिवस उपचार घेतल्यानंतर दोन्ही दाम्पत्यांनी कोरोनावर मात केली होती. ते अगदी ठणठणीत बरे होऊन घरी परतले पण या दरम्यान त्यांच्या कुत्र्याचे निधन झाले. श्वानाच्या निधनाचा त्यांच्या दोघांवर जबरदस्त मानसिक आघात झाला. यामुळे मागच्या काही दिवसांपासून हे दाम्पत्य नैराश्यात गेले होते. याच नैराश्यातुन त्यांनी सोमवारी दुपारी घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक तपास केला असता हे दाम्पत्य मागच्या काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती शेजारच्यांकडून देण्यात आली आहे. कुत्र्याच्या निधनानंतर त्यांची ही स्थिती झाल्याचे शेजारच्यांनी सांगितले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरवली जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment