भाजपच्या नौटंकीपासून चौंडीचे रक्षण करा ; धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गत अठरा वर्षांपासून भारतीय जनता पक्ष धनगर समाजाला आरक्षणाच्या प्रश्नावरून फसवत आहे. वेगवेगळे नेते पुढे करून समाजाला संभ्रमित करण्याचा प्रकार सराईतपणे सुरू आहे. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी ३१ मे २०२१ रोजी त्यांचे जन्मगाव चोंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे आरक्षणाचा जागर् या नावाखाली भाजपच्यावतीने आंदोलनाची नौटंकी केली जाणार आहे. यावेळी चौंडीतील अहिल्यादेवींचे जन्मस्थान परिसराबरोबरच त्यांचे विचार आणि प्रतिष्ठेचे संरक्षण प्रशासनाने करावे, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

भाजपचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी चोंडीत ३१ मे रोजी आरक्षणाचा जागर करणार असल्याचे सोशल मिडीयावरून जाहीर केले आहे. त्यासंबंधाने प्रशासनाने पुरेशी काळजी घ्यावी, अशी मागणी ढोणे यांनी जामखेडचे तहसिलदार आणि पोलिस निरीक्षकांना भेटून केली.

गेले चौदा महिने संपुर्ण देश कोरोना विरोधात लढत असताना पडळकर हे सातत्याने वादग्रस्त विधाने करून तणाव निर्माण करत आहेत. सामाजिक ऐक्य धोक्यात आणण्यासाठी त्यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये जेजुरीमध्ये झालेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा उद्धघाटनाच्या कार्यक्रमात धुडगूस घातला. अहिल्यादेवींच्या पुतळ्याची त्यांनी अवहेलना केली. तेथील गुन्ह्यात पडळकर हे आरोपी आहेत, मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. स्टंट करण्यात पटाईत असलेल्या पडळकर यांनी धनगर समाजाची वेशभुषा वापरून वादंग माजवला आहे. या अनुषंगाने चोंडीत गडबड करण्याचा प्रकार घडू शकतो. स्वत:च गोंधळ माजवून प्रशासनाला वेठीस धरले जावू शकते. सोशल मिडीयाचा यासाठी वापर केला जावू शकतो. त्यामुळे प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी ढोणे यांनी केली.

भाजपने सातत्याने धनगर समाजाला खोटी आश्वासने दिली आहेत. पडळकर यांनी अखेरचा लढा या आंदोलनाच्या नावाखाली समाजाचा मोठा विश्वासघात केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी कोणेतेही सकारात्मक अॅफिडेव्हिट दिलेले नसताना पडळकर थापा मारत आहेत. यासंदर्भात आम्ही अनेकदा जाहीर आव्हान दिलेले आहे, मात्र ते स्वीकारले गेलेले नाही. त्यामुळे पडळकरांना चोंडीसारख्या पवित्र ठिकाणी येवून थापाबाजी करण्याचा कोणताही अधिकार नाही. राज्य कोरोनाच्या संकटात असतानाा पडळकरांकडून सुरू असलेले भडकाविण्याचे उद्याोग समाज सहन करणार नाही, असा इशाराही ढोणे यांनी दिला आहे.

चोंडी येथे गेल्या पाच-सहा वर्षात अहिल्यादेवी जयंतीचा कार्यक्रम म्हणजे भाजपचा राजकीय अड्डा झाला आहे. तिथे अहिल्यादेवींपेक्षा भाजपच्या नेत्यांचा जयजयकार होत असतो. इथे एकदा दंगलही झाली आहे. त्यामुळे चोंडीत ३१ मे रोजी शासकीय जयंती सोहळा झाला पाहिजे, ही भुमिका घेवून गेली तान वर्षे आमचा पाठपुरावा सुरू आहे. यंदाही मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. कोरोना परिस्थितीमुळे निर्बंध असलेतरी प्रशासनाच्या प्रतिनिधींनी अहिल्यादेवींना अभिवादन करावे, अशी मागणी केल्याचे ढोणे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment