चंद्रकांत पाटलांना लाजलज्जा आहे का? ‘या’ धनगर समाजाच्या नेत्याने केली सडकून टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनगर मतदारांना भुलवण्यासाठी शुद्ध थापा मारण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी ‘एसटी- बी’ प्रवर्ग केल्याचे पाटील सांगत आहेत. पाटील हे पराकोटीचे खोटे बोलत असल्याने त्यांना लाजलज्जा आहे कां, असा प्रश्न पडतो, अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील हे मतदारांना संभ्रमित करणारी माहीती देत असल्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानाची सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे, ते विधान पाटील यांनी पुण्यात भाजप ओबीसी सेलच्या कार्यक्रमात केले आहे. धनगर आरक्षणाचा संबंध जोडून बोलताना पाटील यांनी काहींसाठी ‘मुर्ख’ हे संबोधन वापरले आहे. या पार्श्वभुमीवर धनगर समाजाला वस्तुस्थिती समजावी म्हणून आम्ही ही भुमिका मांडत आहोत.

पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देतो असे म्हणून 2014 ला भाजप सरकार सत्तेवर आले. प्रत्यक्षात पाच वर्षे समाजाला खेळवण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही. उलट समाजात बोगस आंदोलने उभी करून समाजाचे नुकसान केले. उच्च न्यायालयात धनगर व धनगड एकच आहेत, असे एफिडेव्हेट दिल्याचे समाजाला खोटे सांगितले. प्रत्यक्षात एफिडेव्हेटमध्ये वेगळाच मजकूर लिहला. ही फसवणूक कमी की काय म्हणून चंद्रकांत पाटील सपशेल खोटी माहिती पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने सांगत आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी ‘एसटी- बी’ प्रवर्गाची व्यवस्था केल्याचे सांगितले. वस्तुत: अशी कोणतीही व्यवस्था फडणवीसांनी केल्याचे महाराष्ट्राल माहिती नाही. देवेंद्र फडणवीस यासंबंधाने कधी बोललेले नाहीत. राज्य सरकारच्या बैठकीत कुठे हा विषय आलेला नाही. त्यासंबंधाने एकही शासकीय कागदपत्र उपलब्ध नाही. ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनातरी माहित कां, अशी शंका यावी, असे पाटील यांचे विधान आहे. फडणवीस यांनी ही व्यवस्था केली होती तर धनगरांना आरक्षण कां मिळाले नाही? आणि अशी व्यवस्था केल्याचे फडणविसांनी फक्त चंद्रकांत पाटलांनाच सांगितले कां? याचे स्पष्टीकरण भाजप व फडणवीसांनी आता दिले पाहिजे. भाजपकडून सातत्याने धनगर समाजाची दिशाभुल केली जात आहे. चंद्रकांत पाटील हे तर कहरच करत आहेत. पुर्णपणे खोटी माहिती देवून ते समाजाची चेष्टा करत आहेत. त्याशिवाय ते आचारसंहितेचा भंगही करत आहेत. आम्ही त्यासंबंधी तक्रारही दाखल करणार आहोत, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.

भाजप प्रत्येक निवडणुकीत धनगर समाजाला भुलवणारी वक्तव्ये करत आहे. त्यामुळे आता भाजपने धनगर आरक्षणप्रश्नी आपली नेमकी भुमिका स्पष्ट करावी. भाजप नेते मधुकर पिचड यांची भुमिका काय आहे, हेही भाजपने जाहीर करावे, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment