महिमानगड परिसरातील गावांचा उरमोडी सिंचन योजनेत समावेश करावा – दादासो काळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस

माण तालुक्यातील उत्तर व पश्चिमेकडील गावांना वरदायिनी ठरणारी जिहे कटापूर सिंचन योजना प्रलंबित पडली असून ती मार्गी लावावी. तसेच महिमानगड परिसरातील सिंचन योजनेपासून वंचित असलेल्या गावांचा उरमोडी सिंचन योजनेत समावेश करावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिल्याची माहिती राष्ट्रीय कॉग्रेस युवकचे राज्य चिटणीस दादासाहेब काळे यांनी दिली.

वडूज (ता.खटाव) येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इतिहासाला उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र काॅग्रेसने सुरु केलेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान चलो बचाऐ संविधान’ हे अभियान संपन्न झाले, त्याप्रसंगी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमास प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, अॅड. उदयसिंह पाटील, शिवराज मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की ,जिहे कठापूर योजनेचे आंधळी धरणामध्ये पाणी आल्यानंतर माण तालुक्यातील आंधळी भागासह माण उत्तर व माण तालूक्यातील बहुतांशी भाग कायमस्वरूपी ओलीताखाली येणार आहे. यासाठी जिहे कठापूर योजनेचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लावून निधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. तसेच महिमानगडसह परिसरातील पांढरवाडी, कोळेवाडी, दिवडी, उकीर्डे, स्वरुपखानवाडी, पिंगळी बु!! या गावांचा कोणत्याही योजनेमध्ये सामावेश नाही. या गावांचा नव्याने उरमोडी योजनेमध्ये सामावेश करुन कायमस्वरुपी पाण्यापासून वंचीत असलेल्या गावांना पाणी देऊन त्यांचा पाणी प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. यावेळी विजय धट,संजीव सांळूखे, संदिप सजगने, विकास गोंजारी, अनिल लोखंडे उपस्थित होते.

Leave a Comment