सातारा जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 55 जनावरांना लंम्पी त्वचारोगाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात जनावरांच्या लंम्पी आजाराचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील फलटण, खटाव, सातारा, कराड तालुक्यात एकूण 55 जनावरे बाधित झाले आहेत. यामध्ये 45 गाईंचा तर 10 बैलांचा समावेश आहे. यासाठी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय विभाग सज्ज झाले आहे.

ज्या ठिकाणी जनावरांमध्ये त्वचा रोगाचे संक्रमण दिसून येत आहे. त्या परिसरातील 5 किलोमीटर भागात जनावरांना लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील 9 गावांमध्ये आढळलेल्या जनावरामध्ये एकही गाई किंवा बैल दगावला नसून पशुपालकांनी घाबरू नये. या आजाराबाबत लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त अंकुश परिहार यांनी केल आहे.

लम्पीची लक्षणे आणि बचाव लक्षणे

१)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
२)लसिकाग्रंथीना सूज येते.
३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
४)दुधाचे प्रमाण कमी होते.
५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

काय घ्यावी काळजी ?

लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

१)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
२)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
१०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.