Train to Kashmir : भारताच्या हृदयातून काश्मीरपर्यंत धावणारी रेल्वे केवळ तांत्रिक चमत्कार नाही, ती एक संवेदनशील संघर्षाची सजीव साक्ष आहे. ऊधमपूर ते बारामुल्ला असा हा प्रकल्प देशातील सर्वात कठीण भूभागातून, प्रतिकूल हवामानातून, आणि सततच्या दहशतवादाच्या सावटातून तयार झाला आहे.
हे रेल्वे जाळं पूर्ण व्हायला जवळपास एक शतकाचा कालावधी लागला. स्वातंत्र्यपूर्व काळात राजा प्रताप सिंहांनी याचे स्वप्न पाहिले होते, परंतु प्रत्यक्षात त्याची पायाभरणी २००३ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झाली. त्यानंतर वर्षानुवर्षे या प्रकल्पाने संकटांची सावली झेलली … कधी डोंगरफुटी, कधी निधीअभावी थांबलेले काम, आणि कधी दहशतवादाच्या छायेखाली झगडणारे कामगार.
दहशतवादाच्या काळोखातही पेटता राहिला विकासाचा दिवा
या प्रकल्पाचा सर्वात काळा अध्याय म्हणजे वर्ष २००४ मध्ये झालेली एक भीषण घटना. श्रीनगरमध्ये रेल्वे प्रकल्पावर काम करणाऱ्या एका अभियंत्याला आणि त्याच्या भावाला दहशतवाद्यांनी अपहरण करून ठार मारले. या घटनेने संपूर्ण प्रकल्पाला हादरा बसला. त्यानंतर अनेक वेळा श्रमिकांनी काम थांबवले, सुरक्षा रक्षकांच्या छावणीतच काम चालू राहिले. या रेल्वेमार्गावर १२ पेक्षा जास्त कामगार विविध अपघातांमध्ये आपले प्राण गमावून बसले. कुणाचं नाव वर्तमानपत्रातही झळकलं नाही पण त्यांच्या हाताने घडलेली ही वाट, हजारो लोकांसाठी आता जगण्याचा नवा मार्ग बनते आहे.
भूगर्भातील आव्हाने, डोंगरांचा प्रतिकार आणि निसर्गाचा असहकार
ही केवळ तांत्रिक प्रगती नव्हती, ही होती भूगर्भातील अनिश्चिततेशी लढाई.३३ नंबरच्या सुरंगात* पाण्याचे झरे सतत झिरपत होते, त्यामुळे काम वारंवार थांबावे लागत होते. उंच डोंगरात साहित्य पोहोचवण्यासाठी अनेक एप्रोच रोड्स बांधावे लागले. काही ठिकाणी केवळ एक फावडे चालवायला एक तास लागायचा तिथे एका-एका इंचात वाट मोकळी करण्यात वर्षे निघून गेली.
तरीही, या सगळ्या संकटांमधून ही रेल्वे लाईन उभी राहिली … 36 बोगदे, 943 पूल, चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज, आणि देशातील पहिला केबल-आधारित रेल्वे पूल ही तिची वैभवशाली लक्षणं आहेत.
प्रकल्प फक्त भौगोलिक नव्हे, तर सामाजिक आणि मानसिकदृष्ट्याही कठीण
या रेल्वेच्या रेषांवर चालणारी प्रत्येक ट्रेन त्या कामगारांच्या स्वप्नांची आणि त्यांच्या कुटुंबांच्या अश्रूंनी सजलेली आहे. कोरोना महामारीच्या काळातही काम थांबलं, अनेक कामगार स्थलांतरित झाले. परंतु कामाचा ध्यास घेऊन काही अभियंते आणि टीम्स दिवसरात्र कडाक्याच्या थंडीत, अंधाऱ्या बोगद्यांमध्ये काम करत राहिल्या.
काश्मीरच्या प्रगतीचा नवा अध्याय
आज ही रेल्वे सेवा फक्त प्रवास सुलभ करत नाही, ती काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला नवे पंख देते. स्थानिक शेती, हस्तकला, पर्यटन आणि उद्योगांना देशभरात पोहोच मिळेल. याशिवाय, जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक भारही कमी होईल. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जेव्हा महामार्ग बंद झाला होता, तेव्हा याच रेल्वेने सुरक्षा दलांचं हालचाल सुकर केली होती.
एक ट्रेन… हजारो स्वप्नांची दिशा
ऊधमपूर ते श्रीनगरपर्यंत धावणारी ही ट्रेन म्हणजे फक्त प्रवासाची साधनं नाही . ती देशाच्या धैर्याची, तंत्रज्ञानाची आणि एकात्मतेची चालती प्रतीकं आहे. या प्रकल्पात जे जे योगदान दिलं, त्यामध्ये काही नावं गाजली, काही विसरली गेली… पण त्यांच्या योगदानाशिवाय ही रेल्वे शक्यच नव्हती. काश्मीरला जोडणाऱ्या या रेषा खरंतर स्वप्नांना मार्ग दाखवणाऱ्या वाटा आहेत. काश्मीरसाठी ही ट्रेन एक नव्या उगमाची सुरुवात आहे. आणि भारतासाठी ती आहे अखंडतेची रेल्वे, जी डोंगर पार करते, पण मनं जोडते.