राज्यात 22 जिल्हे, 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव; पुण्यातून शिवनेरी,साताऱ्यातून माणदेश, बीडमधून अंबेजोगाई तर नगरचे त्रिविभाजन, पहा यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्य निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने हा प्रस्ताव मांडला आहे.

सर्वात मोठ्या नगर जिल्ह्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती करा अशी मागणी सातत्याने उठवली जात होती. आता नगर जिल्ह्यात शिर्डी, संगमनेर,श्रीरामपूर अशा जिल्ह्यांची निर्मिती होऊन त्रिविभाजनाचा प्रस्ताव समोर आला आहे. पुण्यातून शिवनेरी, साताऱ्यातून माणदेश तर रायगडमधून महाड जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव आहे. मराठवाड्यातील बीड आणि लातूर जिल्ह्याचे विभाजन करून बीडमधून अंबेजोगाई तर लातूरमधून उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव आहे. उदगीर जिल्ह्याची निर्मिती करा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्या मागणीला अखेर यश मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार या जिल्ह्या निर्मितीच्या प्रस्तावाला मंजुरी देणार का, कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती आता होणार याकडे महाराष्ट्रातील जागरूक जनतेचे लक्ष्य लागले आहे.

नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण जिल्ह्याच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. तर मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण असे दोन नवे जिल्हे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

लातूरमधून उदगीर जिल्हा निर्मितीच्या हालचालींना वेग

लातूर जिल्ह्यातील उदगीरला जिल्हा म्हणून मान्यता देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कर्नाटक सीमावर्ती भागाला लागून असलेला उदगीर तालुका हा शिक्षण, व्यापार आणि अन्नधान्याची बाजारपेठ यासाठी प्रसिद्ध आहे. उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी सातत्याने आंदोलन करण्यात आली आहेत. आता सरकारने विभागीय आयुक्तांना उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्याने, उदगीर आता जिल्हा होण्याची चिन्हं आहेत.

उदगीर जिल्हा झाला तर लातूर जिल्ह्यातील देवणी आणि जळकोट हे तालुके त्यात समाविष्ट होतील, तर नळेगाव हा नव्याने तालुका होईल आणि नांदेड जिल्ह्यातील मुकरमाबाद हा नव्याने तालुका होऊन उदगीरमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर आणी मुखेड देखील उदगीरला जोडता येऊ शकते. उदगीर जिल्हा करताना साधारणतः 60 किमी अंतरावरील मोठ्या लोकसंख्येच्या गावांना तालुका म्हणून मान्यता दिली जाऊ शकतो.

कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मितीचा प्रस्ताव ?

नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण

ठाणे जिल्ह्यातून- मीरा-भाईंदर आणि कल्याण

बुलडाणा जिल्ह्यातून खामगाव

यवतमाळ जिल्ह्यातून पुसद

अमरावती जिल्ह्यातून अचलपूर

भंडारा जिल्ह्यातून साकोली

चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर

गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी

जळगाव जिल्ह्यातून भुसावळ

लातूर जिल्ह्यातून उदगीर

बीड जिल्ह्यातून अंबेजोगाई

नांदेड जिल्ह्यातून किनवट

सातारा जिल्ह्यातून माणदेश

पुणे जिल्ह्यातून शिवनेरी

पालघर जिल्ह्यातून जव्हार

रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड

रायगड जिल्ह्यातून महाड

अहमदनगर – शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर

Leave a Comment