छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईनंतर शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा (Chhatrapati Sambhajinagar) … पण शिवसेनेच्या फुटीत संभाजीनगरच्या… या बालेकिल्लाला सुरुंग लागला…आणि जवळपास सर्वच आमदार आणि स्थानिक नेत्यांनी शिंदेंच्या बंडाळीला साथ दिली … यानंतर महायुतीच्या विरोधात असणारं वातावरण, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती पाहता संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाला उभारी मिळेल, अशी शक्यता होती… लोकसभेलाही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली… यात चंद्रकांत खैरे यांच्या विजयाचा अंदाज एक्झिट पोल पासून ते सर्वांनीच गृहीत धरला होता…पण निकाल लागला आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर तिकीट मिळालेल्या संदिपान भुमरेंचा छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्चर्यकारकरीत्या विजय झाला…याचाच अर्थ संभाजीनगरच्या जनतेने शिवसेना म्हणून कौल शिंदे गटाला दिलाय…

पण आता खरी कसोटी आहे ती विधानसभेची… संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे तब्बल सहा आमदार आहेत. यातील एक आमदार सोडले तर बाकीचे सर्व पाच आमदार शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे आता संभाजीनगरवर आणि त्याच अर्थाने शिवसेनेवर दावा करायचा असेल, तर या सहा जागांचा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे… छत्रपती संभाजी नगरचे कोणते सहा विधानसभा मतदारसंघ शिवसेना कुणाची याचा कौल देणार आहेत? सध्याच्या घडीला शिंदे आणि ठाकरे गटांपैकी नेमके कुणाचे आमदार इथून निवडून येण्याचे जास्त चान्सेस आहेत? त्याचाच घेतलेला हा इंडेप्थ आढावा…

YouTube video player

यातला पहिले येतो तो सिल्लोड विधानसभा मतदारसंघ… अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे विद्यमान आमदार… सध्या ते शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत… 2009 मध्ये काँग्रेस पक्षातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली… उभ 2009 ला काँग्रेसच्या कार्यकाळात ते राज्यमंत्रीही राहिले… पुढे 2014 ला काँग्रेसच्याच तिकिटावर निवडून आल्यानंतर 2019 ला मात्र ते भाजपामध्ये जाणार असल्याच्या जोरदार चर्चा झाल्या… फडणवीस, दानवे आणि भाजपतील इतर पक्षांसोबतची त्यांची जवळीक वाढली… काँग्रेस पक्षात राहूनच त्यांनी 2019 च्या निवडणुकीत रावसाहेब दानवेंना पंजाचं निर्णायक बहुमत दिलं… स्वतः सत्तारांची इच्छा असतानाही त्यांचा भाजप प्रवेश रखडला… मात्र अखेर त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोडची विधानसभा लढवली… आणि जिंकली देखील… त्यामुळे 2019 ते या क्षणापर्यंत एवढाच काय तो त्यांचा शिवसेनेशी संबंध आला… त्यातही शिवसेना फुटीत त्यांनी शिंदेंना साथ दिली आणि मंत्री देखील झाले… पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दानवेंचा प्रचार करूनही ज्या सिल्लोडमधून त्यांना निर्णायक मत पडायची.. त्याच मतदारसंघात ते पिछाडीवर गेले… एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण दानवेंचं काम करतो, पण दानवे आपल्याला विधानसभेला हवी तशी मदत करत नाहीत, असं म्हणून अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना मदत केल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं… विधानसभेच्या तोंडावरच त्यांनी दानवे – सत्तार वादाला पुन्हा नव्याने तोंड फोडलं… आणि महायुतीत मिठाचा खडा टाकला… हे प्रकरण पुढे जाऊन शांत होईलही… सत्तारांना महायुतीकडून उमेदवारी मिळेलही… पण भाजपचे पदाधिकारी यावेळेस त्यांचं काम करतील का? हा मोठा प्रश्न आहे… त्यात एका ओपिनियन पोलनुसार सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून 27 हजार 759 मतांनी पिछाडीवर जातील असा अंदाज आहे… थोडक्यात अब्दुल सत्तारांनी हिंदुत्वासाठी धरलेली शिंदेंच्या शिवसेनेची साथ शेवटी त्यांच्यावरच उलटताना दिसतेय… सत्तारांचा कार्यक्रम करण्यासाठी ठाकरे गटाकडून सिल्लोडच्या जागेची मागणी होऊ शकते… जर मशालीला ही जागा सुटली तर मुस्लिम आणि दलित समाजाची मतं त्यासोबतच ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती लक्षात घेता अब्दुल सत्तारांसाठी सध्यातरी आमदारकीची वाट बिकटच दिसतेय…

दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कन्नड विधानसभा… मराठवाडा आणि खानदेशच्या सीमेवरचा मतदार संघ म्हणजे कन्नड विधानसभा… शिवसेना ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत सध्या इथले विद्यमान आमदार… 2009 पासून सलग दोन टर्म इथे पक्ष बदलला मात्र आमदारकीचा चेहरा काही बदलला नाही तो म्हणजे हर्षवर्धन जाधव यांचा… त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उदयसिंग राजपूत यांचा प्रत्येक वेळेस निसटता पराभव होत आला… मात्र 2019 ला निवडणुकीपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि कन्नडचं तिकीटही मिळवलं…आणि कन्नडमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवला देखील… हर्षवर्धन जाधव यांनी तेव्हाही कडवी झुंज दिली पण त्यांना राजपूत यांचं लीड तोडता आलं नाही… शिवसेनेच्या बंडात छत्रपती संभाजीनगरमधून सर्वच आमदार शिंदेंना जाऊन मिळाले अपवाद फक्त उदयसिंग राजपूत यांचा… ते ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले… शिंदे गटाकडून त्यांना अनेकदा पक्षात येण्यासाठी ऑफर देण्यात आल्या…जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात आपण शिंदे गटात प्रवेश केला नाही…म्हणून सूड उगवला जातोय, असा आरोप करत राजपूत यांनी डीपीडीसीच्या बैठकीत फाईल भिरकावली… मुख्यमंत्री शिंदेंनी थेट कन्नड विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे नसल्याची खंत व्यक्त करत तो लवकरच ताब्यात घेऊ असं जाहीरपणे बोलूनही दाखवलं होतं…. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला कन्नड सोयगाव मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी काटे की टक्कर पाहायला मिळेल… कन्नडचा विजय फक्त महत्त्वाचाच नाही तर दोन्हीही शिवसेनेसाठी यामुळे प्रतिष्ठेचा ठरू शकतो…

तिसरा मतदारसंघ आहे वैजापूर विधानसभेचा… 1999 ते 2014 दरम्यान झालेल्या चारही लोकसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघाने शिवसेनेच्या पाठीशी आपली भक्कम ताकद उभी केली होती…मात्र 2014 ला युती तुटल्याचा फायदा घेत राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगांवर वैजापूरमधून 4709 मतांनी विजयी झाले होते… पण 2019 ला पुन्हा या मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश बोरनारे निवडून आले… या मावळत्या विधानसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वैजापूर मध्ये मोठा फटका बसला… बोरनारे सध्या शिंदे गटात गेल्यामुळे महायुतीकडून त्यांच्याच नावावर पुन्हा शिक्कामोर्तब होऊ शकतो… राहिला प्रश्न महा विकास आघाडीचा… तर राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत विरोधातला उमेदवार कोण? याचं उत्तर आधीच दिलं… विधानसभेच्या आपल्या उमेदवारीवर मोहर उमटवण्यासाठी चिकटगावकर यांनी लोकसभेला खैरेंच्या पाठीशी मोठी ताकद लावली होती… मात्र तरीही ते पिछाडीवर गेले… त्यामुळे शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार रमेश बोरनारे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यातला सामना अटीतटीचा झाला तरी शिंदेंचे आमदार सध्या इथे प्लसमध्ये दिसतायेत…

चौथा मतदारसंघ आहे तो औरंगाबाद मध्य विधानसभा… शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल सध्या इथले विद्यमान आमदार… खरं म्हणजे 2009 ला ही प्रदीप जयस्वाल यांनी शिवसेनेकडूनच औरंगाबाद मध्यवर भगवा फडकवला होता… पण 2014 ला इम्तियाज जलील औरंगाबाद मध्य मधून एमआयएमच्या तिकिटावर आमदार झाले…पण 2019 ला जलील खासदार झाल्याने आणि शिवसेना आणि भाजप युतीमुळे राष्ट्रवादीकडून अब्दुल सय्यद यांनी रिंगणात उतरण्याचं धाडस दाखवलं असलं तरी प्रदीप जयस्वाल यांचा विजय सोपा झाला… शिवसेना फुटीत ते शिंदे गटात गेल्यामुळे आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातून संदिपान भुमरे यांच्या पाठीशी असणारं मतदान पाहता शिवसेनेचा शिंदे गट इथे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे… मात्र लोकसभेतील पराभवानंतर इम्तियाज जलील औरंगाबाद मध्य मधून विधानसभेसाठी उभे राहिले तर इथे खरी लढत ही प्रदीप जयस्वाल विरुद्ध इम्तियाज जलील अशी होण्याचे जास्त चान्सेस आहेत…

पाचवा मतदार संघ आहे औरंगाबाद पश्चिमचा… शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट इथले विद्यमान आमदार. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघातून शिरसाटांनी तब्बल तीन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे… जातीय समीकरणांमध्ये संमिश्र मतदारसंघ अशी औरंगाबाद पश्चिमची ओळख असल्यामुळे शिवसेनेसाठी शहरातील हा सर्वात सेफ मतदार संघ समजला जातो. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचा पराभव करत तब्बल 40 हजारच्या लीडने शिरसाट मावळत्या विधानसभेला निवडून आले होते. मात्र यंदा शिवसेनेची दोन शकले पडलेली असल्यामुळे इमआयएम, ठाकरे गट हे या मतदारसंघातून शिरसाटांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याचा प्रयत्न करतीलच. पण तूर्तास तरी शिरसाटांची गाडी इथे जोरात आहे…

आता पाहूयात शिवसेनेचा शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे पैठणचा… छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून संदिपान भुमरे खासदार झाल्यामुळे पैठणची जागा सध्या रिक्त आहे. तब्बल पाच टर्म पैठण विधानसभेवर संदिपान भुमरे निवडून जात होते… मावळत्या विधानसभेला भाजपसोबत बंडखोरी करून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेल्या दत्ता गोर्डे यांच्यामुळे भुमरे अडचणीत येतील, असं बोललं गेलं… पण भुमरे दणक्यात पाचव्यांदा आमदार झाले… लोकसभेला तर अनपेक्षितपणे भुमरेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली… आणि ते जिंकले सुद्धा… पण पैठण विधानसभा हा लोकसभेला छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही तर तो येतो जालना लोकसभेत… भूमरेंच्या याच पैठणमध्ये महायुतीचे रावसाहेब दानवे हे पिछाडीवर असल्याने भुमरे आणि शिवसेना शिंदे गटाची चांगलीच तारांबळ झाली आहे. भुमरे खासदार झाल्याने भाजपकडून डझनभर इच्छुकांची भाऊगर्दी असल्यामुळे भाजप पैठण आपल्यालाच मिळावा, यासाठी जोरदार बुलिंग करू शकतो… पण शिवसेना शिंदे गटाला ही जागा सुटल्यास दानवे आणि भाजपचे कार्यकर्तेच विरोधात गेले तर इथे महायुतीच महायुतीचा काट्याने काटा काढू शकते… त्यामुळे या सगळ्या गदारोळात सध्यातरी महाविकास आघाडीला उभारी घेण्याचा फुल टू स्कोप आहे… त्यामुळे शिंदे गटाचे पाच आणि ठाकरेंच्या बाजूने अवघा एक आमदार राहिलेल्या…लोकसभेला खासदारकीही गमावलेल्या…ठाकरे गटाला शिंदे गट आमदारकीलाही वरचढ ठरेल का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच…बाकी छत्रपती संभाजीनगर मध्ये कुणाची हवा? ठाकरे की शिंदे? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा….