कोयना- कृष्णा नदीपात्रात नागरिकांनी गणपती विसर्जनासाठी जावू नये : तहसीलदार आनंदराव देवकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गेल्या चार दिवसात पाऊसाचे प्रमाण वाढलेले असल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कराड तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायती मार्फत नेमण्यात आलेल्या पथकाद्वारेच गणपती विसर्जन करण्यात येणार आहे. तर कृष्णा- कोयना नदीकाठावरील नागरिकांनी नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी जाऊ नये, असा आदेश कराडचे प्रभारी तहसिलदार आनंदराव देवकर  यांनी काढला आहे.

कराड, पाटण तालुक्यात गेल्या चार दिवसापासुनच्या पावसाने 105 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले कोयना धरण पूर्णपणे भरलेले आहे. त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या सर्व पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात आहे. कालपासून 50 हजार क्यूसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे. कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्यांची पाणीपातळी वाढल्याने नदीकाठावरील गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी दि. 14 रोजी पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असा आदेश प्रशासनाने काढला आहे. तर कराड नगरपालिका व पोलिसांनी कराडच्या प्रीतिसंगमावर गणपती विसर्जनासाठी विशेष तयारी केली आहे. प्रशासनाकडून येथे गणपती विसर्जित केले जाणार आहेत.

Leave a Comment