तुळजापूर-सोलापूर महामार्ग उद्यापासून बंद; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुळजापूर – सोलापूर महामार्गावरून होणाऱ्या वाहतुकीबाबत धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. धाराशिव येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे तुळजापूर – सोलापूर महामार्ग हा तीन दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या बुधवार, दि. 27 ऑक्टोबर पासून दि. 29 ऑक्टोबरपर्यंत ३ दिवस तुळजापूर-सोलापूर हा महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरुन उद्यापासून शुक्रवारपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारीबाबत धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल सोमवारी विभागनिहाय यंत्रणेची आढावा बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी तुळजापुरातील शारदीय नवरात्र महोत्सव दि. 6 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर रोजी कालावधीत होत असल्याने या कालावधीत देशभरातून आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांकडून उपस्थिती लावली जाते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन, मंदिर प्रशासन व तुळजापूर नगरपालिका प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने 100 सीसीटीव्ही कॅमेरे

नवरात्र महोत्सवाची प्रशासन पातळीवर संपूर्ण तयारी झालेली आहे. भाविकांना मंदिरात जाण्यासाठी घाटशीळ पार्किंग येथून प्रवेश दिला जाणार आहे व बाहेर पडण्यासाठी मातंगी मंदिर, जिजाऊ महाद्वारमधून सोडण्यात येणार आहे. भाविकांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून तिन्ही पुजारी मंडळांकडून पुजार्‍यांची यादी मागविण्यात येणार आहे. अतिक्रमणविरोधी पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने 100 सीसीटीव्ही कॅमेरे, इतर राज्यातील भाविकांना समजण्यासाठी त्या-त्या भाषेत स्पीकर वरून माहिती सांगण्यात येईल, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

शहरात 21 ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था

कर्नाटक व इतर राज्यातील बसगाड्यांसाठी त्यांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या बंदोबस्तासाठी येणार्‍या पोलीस व इतर कर्मचार्‍यांसाठी धर्मशाळा व शहरातील काही जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात 21 ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था असणार आहे.